मुंबई (वृत्तसंस्था) सध्या भविष्याच्या चिंतेने प्रत्येकजण चिंतेत आहे. यासाठी अनेकजण गुंतवणुकीच्या काही पद्धती अवलंबतात. सेवानिवृत्ती सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही सुरक्षित ठिकाणी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर सरकारच्या अटल पेन्शन योजनेत (atal pension yojana) गुंतवणूक करू शकता. योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे पती-पत्नी दोघांनाही दर महिन्याला पैसे मिळू शकतात.
काय आहे अटल पेन्शन योजना?
अटल पेन्शन योजना (APY) ही सरकारने सुरू केलेली सामाजिक सुरक्षा योजना आहे. त्याचा लाभ भारतातील सर्व नागरिकांना वयाच्या ६० वर्षांनंतर दिला जातो. ही नॅशनल पेन्शन स्कीम (NPS) च्या फ्रेमवर्कवर आधारित आहे. एपीवाय अंतर्गत ग्राहकांना प्रत्येक महिन्याला एक हजार, दोन हजार, तीन हजार, चार हजार आणि पाच हजार रुपये घेण्याचा पर्याय आहे. जर तुम्हाला यासाठी नोंदणी करायची असेल, तर तुमच्याकडे बचत खाते, आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे.
या योजनेसाठी पात्रता काय आहे?
अटल पेन्शन योजनेंतर्गत, १८ ते ४० वर्षे वयाचा कोणताही भारतीय नागरिक गुंतवणूक करू शकतो आणि पेन्शन योजनेचा लाभ मिळवू शकतो. खाते उघडण्यासाठी किंवा या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिस किंवा बँकेशी संपर्क साधावा लागेल. या योजनेचा लाभ वयाच्या ६० व्या वर्षी दिला जातो. या अंतर्गत पती-पत्नी दोघेही स्वतंत्र खाते उघडून लाभ मिळवू शकतात.
या योजनेचा काय आहे फायदा?
या योजनेची खास गोष्ट म्हणजे तुम्ही यामध्ये जितक्या लवकर गुंतवणूक कराल, तितका जास्त फायदा तुम्हाला मिळेल. जर एखादी व्यक्ती वयाच्या १८ व्या वर्षी अटल पेन्शन योजनेत सामील झाली, तर वयाच्या ६० व्या वर्षी त्याला दरमहा ५००० रुपये मासिक पेन्शनसाठी दरमहा फक्त २१० रुपये जमा करावे लागतील. अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करणाऱ्या लोकांना आयकर कायदा ८० सी अंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंतचे कर लाभ दिले जातात.
३९ वर्षांखालील पती/पत्नी या योजनेत स्वतंत्रपणे गुंतवणूक करू शकतात आणि त्याचा लाभ त्यांना ६० वर्षांनंतर दरमहा १० हजार रुपये संयुक्त पेन्शन स्वरुपात दिला जाईल. पती-पत्नी ज्यांचे वय ३० वर्षे किंवा त्यापेक्षा कमी आहे, त्यांनी त्यांच्या संबंधित एपीवाय खात्यात दरमहा ५७७ रुपये, वयाच्या ३५ व्या वर्षी ९०२ रुपये गुंतवणूक केल्यास त्यांना १० हजारांच्या गॅरंटीड मासिक पेन्शन व्यतिरिक्त कोणत्याही एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर ८.५ लाख रुपये मिळतील.