नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राजधानी नवी दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. या वाढणाऱ्या रुग्णसंख्येला दिल्लीचं प्रदुषण एक प्रमुख कारण असल्याचं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले आहेत. दिवाळीच्या अगोदर एक दिवस डिजीटल पत्रकार परिषद घेऊन त्यांनी वाढणाऱ्या रुग्णसंख्येवर भाष्य केलं.
दिल्लीतील वाढत्या कोरोना रुग्णांचं खापर केजरीवालांनी शेजारच्या इतर राज्यांवरही फोडलं. “शेतातील कचरा जाळल्याने पूर्ण १ महिना उत्तर भारतातील पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, तसंच दिल्लीमध्ये धूर आणि प्रदुषण असते. पाठीमागच्या १० ते १२ वर्षांपासून प्रत्येक वर्षाच्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात शेतातील कचरा जाळल्याने होणाऱ्या प्रदुषणामुळे उत्तर भारत त्रस्त असतो”, असं केजरीवाल यांनी नमूद केलं. “शेतातील कचऱ्याच्या समस्येने शेतकरी देखील परेशान असतात. परंतु आता शेतकऱ्यांना चिंता करण्याचं काही कारण नाही. कारण अॅग्रिकल्चर इन्स्टिट्यूटने यासंबंधी उपाय शोधून काढला आहे. अॅग्रिकल्चर इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांनी बायो डी कंपोझर बनवलंय. ज्यामुळे शेतकऱ्यांचं काम आता अधिक सोपं होऊन प्रदुषण देखील होणार नाही”, असं केजरीवाल म्हणाले. दिल्लीत कोरोना संक्रमनाचा वेग मंदावला होता. मात्र, गेल्या दोन आठवड्यात संक्रमनाचा वेग वाढला. दिल्लीत २८ ऑक्टोबर रोजी पहिल्यांदा ५ हजार ६७३ नवे रुग्ण आढळले होते. त्यानंतर २ नोव्हेंबर वगळता दररोज पाच हजार पेक्षा जास्त नवे कोरोनाबाधित आढळत आहेत. दिल्लीत कोरोना संक्रमन वाढण्यामागे अनेक कारणं असल्याचं सांगितलं जात आहे. सणांनिमित्ताने लोक एकमेकांच्या जास्त संपर्कात आले. याशिवाय दिल्लीत प्रदूषणदेखील वाढलं आहे. त्याचबरोबर थंडीदेखील वाढली आहे. या कारणांमुळे दिल्लीत कोरोना रुग्ण वाढले आहेत. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन नागरिकांनी मास्क वापरावं, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करावं, असा सल्ला तज्ज्ञांनी दिल्लीच्या नागरिकांना दिला आहे.