नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावानंतर देशात आता परिस्थिती सुधारताना दिसत आहे. सलग तिसऱ्या दिवशी कोरोना बाधितांच्या दैनंदिन संख्येत घट झाल्याचं दिसून आलं. गेल्या २४ तासांत ४५ हजार ९५१ नव्या कोरोनाबाधीतांची नोंद झाली आहे. तर ८१७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातल्या नवबाधितांची संख्या ही बरे होणाऱ्या रुग्णांच्या संख्येपेक्षा कमीच आहे. त्याचबरोबर मृतांची संख्याही एक हजाराच्या खाली आली आहे. देशात गेल्या २४ तासांत ४५ हजार ९५१ नव्या बाधितांची नोंद झाली. त्यामुळे उपचाराधीन रुग्णांची संख्या ५ लाख ३७ हजार ६४ वर पोहोचली आहे. तर गेल्या २४ तासांत ६० हजार ७२९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे देशातल्या कोरोनामुक्तांची एकूण संख्या दोन कोटी ९४ लाख २७ हजार ३३० वर पोहोचली आहे. तर ८१७ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातल्या आत्तापर्यंतच्या मृतांची संख्या आता तीन लाख ९८ हजार ४५४ वर पोहोचली आहे.
लसीकरण आकडेवारी
देशात काल दिवसभरात ३६ लाख ५१ हजार ९८३ नागरिकांनी लसीकरणाचा लाभ घेतला. त्यापैकी २७ लाख ४२ हजार ६३० नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतला. तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ९ लाख ९ हजार ३५३ इतकी आहे. त्यामुळे आता लस घेतलेल्या नागरिकांची एकूण संख्या ३३ कोटी २८ लाख ५४ हजार ५२७ वर पोहोचली आहे.
राज्यातील स्थिती
राज्यात कोरोना बाधितरुग्णांची संख्या हळूहळू वाढू लागली आहे. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी रुग्णसंख्या वाढली आहे. राज्यात आज ८,०८५ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ८ हजार ६२३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत एकूण ५८ लाख ९ हजार ५४८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट ९६ टक्के झाला आहे. सध्या राज्यात १ लाख १७ हजार ०९८ अॅक्टिव रुग्ण आहेत. तर राज्यात २३१ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.