नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत सरकार आधीपासूनच सतर्क राहिले असते, तर त्यांनी तसे नियोजन केले असते. मात्र, दुसऱ्या लाटेबाबत गाफील राहिल्यामुळेच कोरोनाचा देशात कहर झाला आहे. सरकारमधील कमकुवत नेतृत्व आणि दूरदृष्टीचा अभाव यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात मोठे नुकसान केले, अशी कठोर टीका रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केली आहे.
सरकारमधील कोणी जगाकडे लक्ष दिले असते, इतरत्र कोरोनाची काय परिस्थिती आहे, हे पाहिले असते, तर कदाचित भारतात वाईट स्थिती ओढवली नसती, असेही राजन यांनी म्हटले आहे. ब्राझीलमधल्या परिस्थितीतून बोध घेऊन सरकारने आणखी तयारीनिशी सज्ज रहाणे आवश्यक होते, असा सल्ला राजन यांनी दिला आहे.
पहिल्या लाटेवर नियंत्रण मिळवल्यावर सरकारी यंत्रणा आत्मसंतुष्ट बनली आणि तिथेच घात झाला.गेल्या वर्षी पाहिल्या लाटेत दैनंदिन रुग्णसंख्या एका लाखांवर गेली नव्हती. मात्र यावेळी त्यात तीनपटीने वाढ झाली आहे. तसेच देशात लसीकरण मोहिमेतील गोंधळ कोरोनाची साथ वाढण्यास कारणीभूत असल्याचा आरोप राजन यांनी केला आहे.
कोरोनाची दुसरी लाट आणखी घातक बनली असून, केंद्रातील अनेक बड्या अधिकाऱ्यांनी भारताने कोरोनाविरोधातील लढाई जिंकली, भारताने कोरोनाला पराभूत केले, अशा प्रकारच्या घोषणा यापूर्वीच केल्या होत्या. मात्र, प्रत्यक्षात मार्च आणि एप्रिल महिन्यात कोरोनाने पुन्हा शिरकाव केला, असेही राजन यांनी सांगितले.















