नवी दिल्ली (वृत्तसंस्था) कोरोना विषाणूचा धोका अद्याप टळलेला नाही. याच दरम्यान आता दुसर्या एका आजाराने लोकांची चिंता वाढवली आहे. ज्या धर्तीवर काही राज्यांमध्ये सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. हे संकट आहे ‘बर्ड फ्लू’चं. कोरोनानंतर हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, केरळमध्ये ओढावलं नवं संकट. महाराष्ट्रात अद्यापही संकट नाही. अंडी आणि चिकन विक्रीवर बंदी. बिहार, उत्तराखंड आणि झारखंडमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.
काही अधिकाऱ्यांनी हिमालच प्रदेशात असणाऱ्या कांडगा जिल्ह्यातील पोंग बांध तलावात मृतावस्थेत आढळलेल्या काही स्थलांतरित पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूचे विषाणू आढळल्यामुलं हे संकट आता आणखी गडद होताना दिसत आहे. तिथं राजस्थानातील अनेक जिल्ह्यांतूनही पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सोमवारी १७०हून अधिक पक्षी मृतावस्थेत आढळल्याची माहिती समोर येत आहे. पशुपालन विभागाच्या माहितीनुसार ४२५हून जास्त कावळे, बगळे आणि काही पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. झालावाडमधील पक्ष्यांचे काही नमुने परीक्षणासाठी भोपाळमध्ये असणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षा पशुरोग संशोधन संस्थेकडे पाठवण्यात आले होते. ज्यामध्ये बर्ड फ्लूच्या संसर्गाची धक्कादायक माहिती समोर आली. दरम्यान, इतर जिल्ह्यातील नमुन्यांचा अहवाल अद्याप हाती आलेला नाही.
बर्ड फ्लू म्हणजे काय?
बर्ड फ्लूचे बरेच प्रकार आहेत. परंतु, H5N1 हा मानवाला संक्रमित करणारा पहिला एव्हियन इन्फ्लूएंझा व्हायरस आहे. त्याची पहिली घटना १९९७मध्ये हाँगकाँगमध्ये समोर आली होती. त्यावेळी पोल्ट्री फार्ममधील बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव संक्रमित कोंबड्यांमुळे झाला होता. H5N1 हा विषाणू पक्ष्यांमध्ये नैसर्गिकरित्या उद्भवतो. परंतु, तो पाळीव कोंबडीमध्ये सहज पसरतो. हा रोग संक्रमित पक्ष्याच्या मल, अनुनासिक स्राव, तोंडातील लाळ किंवा डोळ्यांतील पाण्याचे संपर्क आल्यास होतो. संक्रमित कोंबड्यांचे मांस १६५ºF वर शिजवल्यास किंवा अंडी वापरल्यास त्याने बर्ड फ्लू पसरत नाही. परंतु, संक्रमित कोंबड्यांची अंडी कच्ची किंवा उकडून खाऊ नयेत.
केरळमधील अलपुझ्झा आणि कोट्टायम येथे या विषाणूच्या प्रसाराची माहिती मिळाल्यामुळं आता प्रभावित क्षेत्रात असणाऱ्या बदक, कोंबड्या आणि अन्य पाळी पक्षांना मारण्याचे आदेश प्रशासनानं दिले आहेत. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार H5N8 विषाणूच्या प्रसारासाठी जवळपास ४० हजार पक्ष्यांना मारावं लागणार आहे.