नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशातील करोनाचा थैमान सुरूच आहे. दिवाळीनंतर करोनाने पुन्हा एकदा रौद्र रूप धारण करण्यास सुरूवात केली आहे.कारण देशात रोज रुग्णसंख्येचा आकडा झपाट्याने वाढत आहे. मृतांची संख्या वाढली असून, गेल्या २४ तासांत देशात ५०० पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
करोनाबाधितांच्या संख्येचा वेग वाढल्याने केंद्र सरकारने राज्यांना तातडीने पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात असताना गेल्या २४ तासांत मोठ्या संख्येने नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीप्रमाणे देशात गेल्या २४ तासांत ४४ हजार ४८९ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. नवीन रुग्णसंख्येची भर पडल्यानं देशातील करोनाची एकूण रुग्णसंख्या ९२ लाख ६६ हजार ७०६ इतकी झाली आहे. मागील २४ तासांत ५२४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांची संख्या वाढून १ लाख ३५ हजार २२३ वर पोहोचली आहे.
सध्या देशात ४ लाख ५२ हजार, ३४४ रुग्ण उपचार घेत आहेत. तर ८६ लाख ७९ हजार १३८ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. मागील २४ तासांमध्ये ३६ हजार रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.