चाळीसगाव (प्रतिनिधी) राज्यात सर्वदूर पावसाचा जोर वाढताना दिसत असून औरंगाबाद-धुळे महामार्ग कन्नड चाळीसगाव घाटातील भयानक दृश्य समोर आली आली. या घाटात दरड कोसळल्यामुळे अनेक गाड्या ढिगाऱ्याखाली अडकल्या आहेत. प्रवास सुरु असताना अचानक दरड कोसळल्याचा आवाज झाला. आता आपण काही वाचत नाही, असाच विचार मनात आला, असा चित्तथरारक अनुभव या अपघातातून वाचलेल्या लोकांनी सांगितला आहे.
या घाटातील काही गाड्या ढिगाऱ्याखाली दबल्या गेल्या आहेत. एका वृत्त वाहिनीचे प्रतिनिधी काही चालकांशी बोलले असता अंगावर शहारे येतील असा अनुभव त्यांनी सांगितला. प्रवास सुरु असताना अचानक दरड कोसळल्याचा आवाज झाला. गाड्यांवर मोठमोठे दगड कोसळू लागले. आता आपण काही वाचत नाही, असाच विचार मनात आला. काही कुटुंबं यातून कशी वाचली. काच फोडून लोकांना कसं वाचवण्यात आलं. एका गाडीत १८ लोकांनी रात्र कशी काढली? हे अनुभव ऐकून कोणाच्याही मनात भीती निर्माण होईल. संपूर्ण रात्र उलटून गेल्यानंतर आज दुपारी जीसीबी मदतीसाठी आले आहेत. एकाने सांगितलं की आमची सगळी अवस्था पाहून काही लोकांनी आम्हाला बिस्कीट पुडे दिले. ७ किलोमीटर चालल्यावर आणि सकाळपासून अन्नाचा कण नसताना या बिस्कीटाची चव काय सांगू? असे अनुभव या अपघातातून वाचलेल्या लोकं सांगत आहेत.
कन्नड घाटात तीन ठिकाणी दरड कोसळल्यामुळे औरंगाबाद-धुळे महामार्ग वाहतूकीसाठी बंद आहे, तरी नागरिकांनी प्रवासासाठी या रस्त्याचा वापर करु नये, औरंगाबादला जाण्यासाठी नांदगाव मार्गाचा वापर करावा, तसेच औरंगाबादहून येण्यासाठी जळगाव मार्गाचा वापर करावा, असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात येत आहे.