जालना (वृत्तसंस्था) मित्रांसोबत झालेल्या वादातून एका तरूणाचा चाकूने भोसकून निर्घृण खून केल्याची घटना आज शनिवारी (दि.६) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास जालना भोकरदन रोडवरील पीरपिंपळगावात घडली. दिलीप हरिभाऊ कोल्हे (वय २९) असे मयत तरूणाचे नाव आहे. या खूनामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार गुटख्याची पुडी मागीतल्याच्या कारणावरून मित्रांमध्ये शिवीगाळ होवून एकाने भोसल्याची प्राथमिक माहिती असल्याचे पोलिस निरीक्षक सम्राटसिंह राजपुत यांनी सांगितले.
जालना – भोकरदन रोडवरील पीरपिंपळगाव शिवारात मयत दिलीप हरिभाऊ कोल्हे व त्याचे काही मित्र दारूपार्टी करीत होते. त्यावेळी एकाने गुटख्याची पुडी मागीतल्याने त्यांच्यामध्ये शिवीगाळ होवून वादावादी झाली. याच वादावादीतून एकाने त्याच्या खिशातील चाकूने छातीत भोसकले. या घटनेची माहिती मिळताच वडील हरिभाऊ व अन्य नातेवाईकांनी गंभीर जखमी दिलीपला खाजगी रूग्णालयात दाखल केले, परंतू डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आला. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सम्राटसिंह राजपुत, पोलिस उपनिरीक्षक पाटील, उपनिरीक्षक सानप, उपनिरीक्षक शिंदे, मदन बहुरे, राजु पवार, तागवाले आदींनी खाजगी रूग्णालयात धाव घेत मृतदेह जिल्हा रूग्णालयात हलविला आहे. सदर घटनेचे वृत्त लिहेपर्यंत चंदनझिरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती. आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आल्याचे पोनि. राजपुत यांनी सांगितले.