अडावद, ता. चोपडा (प्रतिनिधी) येथील वीज वितरण कंपनीच्या अडावद सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या वटार रस्त्यावरील वीज खांबावरील तुटलेला तार जोडण्यासाठी गेलेल्या कंत्राटी वायरमनचा आज सकाळी विजेच्या धक्याने मृत्यू झाला. तर अन्य दोन कर्मचारी जखमी झाल. याप्रकरणी मयताच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून वीज कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यासह पाच कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, विजेचा धक्का बसलेल्या वायरमनला अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल केले असता दोनपैकी एकही वैद्यकीय अधिकारी वेळेवर उपलब्ध नव्हते. तर वेळेत उपचार न मिळाल्याने वायरमनचा मृत्यू झाल्याचा आरोप या वेळी सरपंचासह ग्रामस्थांनी केला. त्यामुळे आरोग्य केंद्राचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
अडावद येथील सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या वटार रस्त्यावरील वीज खांबावरील तुटलेली तार जोडण्यासाठी ६ रोजी सकाळी ८ वाजता परमिट घेऊन तीन कर्मचारी कर्तव्यावर गेले होते. यात ८ महिन्यांपासून कंत्राटी वायरमन म्हणून काम करणारे दिलीप मोतीराम बारेला (वय २८, रा. आडगाव हे वीज खांबावर चढले. मात्र, तार जोडत असताना विद्युत प्रवाह सुरू असल्याने त्यांना विजेचा जबर धक्का बसला अन् खांबावरून पडल्याने त्यांचा मृत्यू झाला. तर त्यांच्या सोबतचे लाईनमन राहूल मनोरे आणि सत्यप्रकाश वाघ हे देखील जखमी झाले आहेत. या प्रकरणी मयताचे भाऊ सुरेश मोतीराम बारेला यांच्या फिर्यादीवरून अडावद पोलीस ठाण्यात अडावद वीज वितरण कंपनीचे उपअभियंता सचिन केदारे, उपकार्यकारी अभियंता साळुंखे, कार्यकारी अभियंता रमेश पवार, ठेकेदार सुमित चौधरी, कर्मचारी योगेश पाटील या पाच जणांवर विद्युत सुरक्षा विषयक साहित्य न पुरवणे तसेच वीज पुरवठा सुरू होऊन मृत्यूस जबाबदार ठरवत भादंवि ३०४, अ, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चव्हाण यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक राजू थोरात करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून महावितरणचा गलथान कारभार की आरोग्य सेवेचा अभाव हे तपासात समजेलच. परंतु, यात नाहक एका आदिवासी उमद्या तरूणाचा बळी गेला, हे सत्य नाकारता येणार नाही.
या नागरिकांनी घेराव घालत डॉक्टरांना विचारला जाब !
या वेळी सरपंच बबनखाँ तडवी, सामाजिक कार्यकर्ते मनोहर पाटील, अमोल कासार, वासुदेव महाजन आदींसह ग्रामस्यांनी घटनेनंतर तब्बल २ तासांनी सकाळी १० वाजता आलेल्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अर्चना पाटील यांना घेराव घालीत कर्तव्यात कसूर केल्याचा जाब विचारला. यावर त्यांनी रात्रीची ड्यूटी डॉ. राहूल पाटील यांची होती. ते मी येईपर्यंत थांबतात. मात्र ते ४ तारखेपासून सुटीवर आहेत, असे त्यांनी सांगितले. परंतु, डॉ. पाटील रजेवर असल्याची कुठलीही नोंद वा रजेच्या अर्जाची प्रत प्रा. आ. केंद्रात आढळली नाही. शासनाने आम्हाला पोलिओ लसीकरणांसह इतरही कामे लावलेली आहेत. एक डॉक्टर रजेवर असतांना वरिष्ठांनी दुस्रा डॉक्टर पाठवायला हवा होता, असे स्पष्टीकरण देत डॉ. अर्चना पाटील यांनी जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला.
वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप !
ही घटना घडल्यानंतर ग्रामस्थांनी तातडीने दिलीप बारेला व अन्य कर्मचाऱ्यांना अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले. परंतु, तेथे नेमणुकीवर असलेल्या दोघा वैद्यकीय अधिकाऱ्यापैकी एकही डॉक्टर उपस्थित नसल्यामुळेप्रंचड गोंधळ उडाला. प्रत्यक्षदर्शी नागरिकांच्या मते मृत वायरमन बारेला यांचा आरोग्य केंद्रात आणल्यावरही श्वास सुरू होता. तातडीने वैद्यकीय सेवा व ऑक्सिजनचा पुरवठा मिळाला असता तर त्यांचा मृत्यू झाला नसता, असा आरोप ग्रामस्थांनी या वेळी केला. परंतु, आरोग्य केंद्रातील कर्मचा-यांनी रुग्णावर प्रथमोपचार न करताच चोपडा येथे पाठवले. त्यामुळेच बारेला या रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप प्रा. आ. केंद्रात जमलेल्या शेकडो ग्रामस्थांनी केला.