अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील दंगल प्रकरणात अटकेतील संशयित आरोपी अश्पाक उर्फ पक्या सलीम शेख (३३, गांधली पुरा, अमळनेर) याचा मृत्यू झाल्याने शहरात सायंकाळी दुकाने पटापट बंद झाल्याने नागरिकांची पळापळ सुरू झाली. मात्र, पोलिस यंत्रणा तत्काळ सतर्क झाल्याने उशिरापर्यंत शहरात तणावपूर्ण शांतता निर्माण झाली होती. दरम्यान, शहरात शांतता प्रस्थापित व्हावी, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी अनेक शाळा, नागरिक, व्यापाऱ्यांनी आज (गुरुवार) दि. १५ रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे.
शहरात ९ रोजी रात्री किरकोळ कारणावरून जिनगर गल्ली, सराफ बाजार, सुभाष चौक भागात दगडफेक झाली होती. त्यात सहा पोलिस जखमी झाले होते. रात्रीच पोलिसांनी २९ आरोपींना अटक केली होती. १३ आरोपींना १४ रोजीपर्यंत पोलिस कोठडी तर १८ जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. पोलिस कोठडीत असलेला माजी नगरसेवक सलीम शेख ऊर्फ टोपी यांचा मुलगा अशपाक ऊर्फ पक्या सलीम शेख याची सोमवार, १२ रोजी रात्री प्रकृती बिघडल्याने त्याला जळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
बुधवारी सायंकाळी उपचार घेतांना अशपाक याचा मृत्यू झाला. अश्पाकच्या मृत्यूची माहिती अमळनेर शहरात पोहोचताच शहरातील सराफ बाजार व सुभाष चौक परिसरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने पटापट बंद केली. दुकाने बंद होताच नागरिकांनी धावाधाव सुरू केली. वेगाने दुचाकी, रिक्षा घराकडे जाऊ लागल्या होत्या. त्यामुळे दगडफेक झाल्याची अफवा पसरली होती.
परंतू पोलिसांनी कुठेही दगडफेक झाली बसल्याचा संदेश द्यायला सुरुवात केली. त्यामुळे नागरिकांची धावपळ थांबली. दुसरीकडे आमदार अनिल पाटील यांनी नागरिकानी शांतता ठेवण्याचे आवाहन केल्याने नागरिकांची भीती दूर होण्यास मदत झाली. दरम्यान, अशपाक याच्या मृत्यूप्रकरणी त्याच्या नातेवाइकांनी इन कॅमेरा पोस्टमार्टम करण्याची मागणी केली होती. त्यानंतर जिल्हा रुग्णालयात पोलिस अधीक्षक एम. राजकुमार व एलसीबी पथकाने भेट देऊन इनकॅमेरा पोस्टमार्टेम करण्यास परवानगी दिली.