नवी दिल्ली (वृत्तसंस्था) देशात कोरोनाचा कहर वाढत असल्याने विद्यार्थ्यांचं आरोग्य धोक्यात न घालण्याच्या दृष्टीने अनेक परीक्षा रद्द करण्यात येत आहे. सीबीएसईच्या दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आल्यानंतर आता आयसीएसई बोर्डानेही दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान बारावीची परीक्षा रद्द करण्यात आलेली नसून लवकरच नवीन तारीख जाहीर होणार आहे.
देशातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काउंसिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्स बोर्डाने अखेर दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तर बारावीची परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीनेच होईल. या परीक्षेची नवी तारीख आणि वेळापत्रक आणखी काही दिवसांनी जाहीर करण्यात येईल, असे ICSE बोर्डाकडून सांगण्यात आले. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्टीकरण बोर्डाकडून देण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वीच सीबीएसई बोर्डाचीही दहावीची परीक्षा रद्द झाली होती. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकार या दोन्ही बोर्डांच्या पावलावर पाऊल ठेवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रात परीक्षेशिवाय दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन करणं अशक्य, असल्याचं मत महाराष्ट्र राज्य माध्यमिक बोर्डाच्या माजी अध्यक्षांनी व्यक्त केलं आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन परीक्षा घेणं उचित शैक्षणिक क्षेत्रातील तज्ञांच मतं आहे. सीबीएसई विद्यार्थ्यांची देशातील एकूण संख्या १९ लाख आहे. तर, एकट्या महाराष्ट्रातील एसएससीची विद्यार्थी संख्या १६ लाख आहे. याशिवाय बारावीची विद्यार्थी संख्या देखील वेगळी आहे. त्यामुळे परीक्षेविना विद्यार्थ्यांना पास करणं अशक्य आहे.
राज्य मंडळाच्या परीक्षा होणारच
राज्य मंडळाच्या परीक्षा पुढे ढकलून त्या मे-जूनमध्ये घेणार असल्याचे शिक्षण विभागाने नुकतेच जाहीर केले. आता ‘सीबीएसई’प्रमाणेच राज्यानेही दहावीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी पुढे आली आहे. मात्र राज्यातील परीक्षा होणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले.