जळगाव (प्रतिनिधी) औरंगाबाद (संभाजीनगर) जिल्ह्यातील वैजापूर येथे नुकत्याच एका घटनेत महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या एका एस.टी. बसवर ‘संभाजीनगर’ अशी पाटी असल्याचे पाहून स्थानिक धर्मांध मुसलमान लोकांनी ती बस अडवली. तेथे त्यांनी अत्यंत आक्षेपार्ह भाषेत शिविगाळ केली, तसेच बसचे चालक आणि वाहक यांना दमदाटी करण्याचाही प्रयत्न केला. कायदा हातात घेणाऱ्या या धर्मांधांवर सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल भा दं संहितेच्या कलम ३५३ अंतर्गत कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी जळगाव येथील समस्त हिंदुत्ववादी संघटनांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.
या निवेदनात म्हंटले आहे की, महाराष्ट्रात गेली अनेक वर्षे औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर व्हावे, ही अनेक शिवप्रेमी महाराष्ट्रीयन लोकांची मनस्वी इच्छा आहे. असे असतांना संभाजीनगरची पाटी पाहून रस्त्यात बस अडवणे आणि ‘आम्ही संभाजीनगर’ कसे होते ते पाहतोच ?’ अशा पद्धतीने शिवराळ भाषेचा उपयोग सार्वजनिक ठिकाणी करणे महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने हानिकारक नाही का ? संभाजीनगरची पाटी पाहून जर कुणाला अयोग्य वाटले, तर महाराष्ट्रात अजूनही कायद्याचे राज्य आहे ना ? रितसर आपली तक्रार योग्य त्या ठिकाणी करून दाद मागू शकतो. असे असतांना रस्त्यावर गाडी अडवून हा जो धिंगाणा घालण्याचा प्रयत्न केला गेला आहे, हे महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने योग्य आहे का ? की यापुढे कुणाला काही अयोग्य वाटले तर त्याने असेच संख्याबळ जमवून रस्त्यावर धिंगाणा घालून, शिविगाळ करून, दमदाटी करून आपली मागणी रेटून नेणे योग्य होईल ? याविषयी विचार करणे आवश्यक आहे. राज्याचे गृहमंत्री या नात्याने आपण या प्रकरणी लक्ष घालून योग्य ती कारवाई करणे अपेक्षित आहे.
तरी या निवेदनाद्वारे आम्ही आपल्याकडे मागणी करतो की, वैजापूर येथे एस.टी बस अडवून सरकारी कामात अडथळा आणण्यार्यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३५३ अंतर्गत कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून यापुढे कुणी कायदा स्वतः हातात घेण्याचा प्रयत्न करणार नाही.
हे निवेदन देताना सर्वश्री मोहन तिवारी, निलेश सपकाळे, राहुल जोशी, येसाजी चव्हाण, अजय मंधान, राजू नन्नावरे, आकाश फडे, प्रशांत जुवेकर, गजानन तांबट आणि अन्य हिंदुत्ववादी उपस्थित होते.