मुंबई (वृत्तसंस्था) माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अटकेचा बदला घेण्याबाबतचा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. शरद पवार चार दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. अनिल देशमुख यांची वस्तुस्थिती मला माहित आहे. देशमुख यांना जो त्रास दिला जात आहे. त्या त्रासाचा प्रत्येक मिनिट वसूल केला जाईल, असा इशाराच पवार यांनी यावेळी दिला.
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत असताना शरद पवार यांनी अनिल देशमुख यांचा उल्लेख केला. ‘राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर नागपूरला आलो आणि माझ्यासोबत अनिल देशमुख नाहीत, असा हा पहिलाच दिवस आहे, अशी खंत पवार यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, काय घडलं ते त्यांनी मला सगळं सांगितलं होतं. आरोप करणारे फरार झाले. पण अनिल देशमुख तुरुंगात आहेत, याकडे पवार यांनी लक्ष वेधलं.
अनिल देशमुख यांनी जिल्ह्यात राष्ट्रवादीला सक्षमपणे हाताळलं. मात्र काही लोक केंद्रातील सत्तेचा दुरुउपयोग करत आहे. काही लोकांना सत्ता गेल्याने करमत नाही. सत्ता आली तर पाय जमिनीवर ठेवायची असतात. ज्याच्या डोक्यात सत्ता गेली, पाय जमिनीवर नसले त्यांची सत्ता गेली तर ते अस्वस्थ होतात. मिळालेली सत्ता सन्मानाने वापरायची हे त्यांना मान्य नाही, असं म्हणत पवारांनी भाजपवर घणाघात केला. ‘भाजप सत्तेचा गैरवापर करत आहे, मात्र ही जनता हे हाणून पाडेल, अनिल देशमुख यांना जो त्रास दिला जातोय, मात्र त्यांचा त्रासाचा एक एक मिनिट वसूल करेल, ते पुन्हा सक्रिय होतील, असंही पवारांनी स्पष्ट केलं.
उत्तर प्रदेशात शेतकरी आंदोलन करत आहेत. केंद्र सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करत आहेत. आताचे केंद्र सरकार एखाद्या राज्यात त्यांना सत्ता आली नाही तर ते सरकार अस्थिर करण्याचं काम करतं. मात्र या राज्याला स्थिर करून जनतेची कामं करायचं आहे, म्हणून महाविकास आघाडी सरकार आले, असंही पवार म्हणाले. मात्र विरोधी पक्ष वेगवेगळ्या एजन्सीच्या माध्यमातून आरोप करून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. अनिल देशमुख यांचा दोष नसताना त्यांच्यावर आरोप झाले, त्यांना अटक झाली आणि आता आरोप करणारे परमवीर सिंग आहेत कुठे? असा सवालही पवारांनी केला.