लिहाखेडी ता. सिल्लोड (वृत्तसंस्था) वीस वर्षांपूर्वी उच्चशिक्षित मुलांनी जन्मदात्या आईला घरातून हाकलून दिलं. गेल्या वीस वर्षांपासून मुलींनी आणि जावयांनीच माय माऊलीचा सांभाळ केला. असं असताना मुलांबद्दल कोणताही राग मनात न धरता, आईने तिन्ही मुलांना भेटण्याची इच्छा अनेकदा व्यक्त केली. गेल्या वीस वर्षांच्या काळात मुलांना कधीही मायेचा पाझर फुटला नाही. ते कधीही आपल्या जन्मदात्या आईला भेटायला आले नाहीत. अखेर मुलांना भेटण्याची इच्छा अधुरी ठेवून माऊलीनं अखेरचा श्वास घेतला आहे.
देवाचे रूप असलेल्या आईला तिच्या पोटच्या गोळ्यांनीच वीस वर्षांपूर्वी घराबाहेर हाकलून दिले. तेव्हा ‘त्या’ आईला आधार दिला, तो मुली व जावयांनी अखेर वृद्धापकाळाने शनिवारी त्या आईने जगाचा निरोप घेतला. तिच्या अंत्यसंस्कारालादेखील तीन मुलांपैकी दोघांनी फक्त पाहुण्यांसारखी हजेरी लावल्याने संतप्त लेकींनी त्या दोघांनाही आईच्या मृतदेहाला हात लावू दिला नाही. तिन्ही मुलींनी एका जाऊबाईच्या मदतीने खांद्यावर आईची तिरडी घेऊन स्मशानभूमी गाठत अंत्यसंस्कार केले.
औरंगाबादच्या हर्सुल परिसरातील ही घटना असून चंद्रभागाबाई आनंदा साखळे (९०, मूळ रा. लिहाखेडी, ता. सिल्लोड) असे निधन झालेल्या वृद्धेचे नाव आहे. त्यांना सुभद्राबाई श्रीकृष्ण टाकसाळे (रा. औरंगाबाद), सुनीता शिवाजी सोने (रा. अनवी), जिजाबाई उत्तम टाकसाळे (रा. कोटनांद्रा), तर जाऊबाई छाया शिरसाठ (रा. लिहाखेडी, ता. सिल्लोड) यांनी खांदा दिला. मुलांनी चंद्रभागाबाईंना वाऱ्यावर सोडले होते. पण तरीही त्या माऊलीला आपल्या तिन्ही मुलांना भेटायची इच्छा होती. अनेक वेळा तिन्ही मुलांना फोन करूनही ते आईला बघायला फिरकले नाहीत. शेवटी मुलांच्या भेटीविनाच तिने आपले प्राण त्यागले.
पोटाला चिमटा घेऊन मुलांना शिकविले
पोटाला चिमटा घेऊन चंद्रभागाबाईनी तिन्ही मुलांसह मुलींना शिक्षण दिले. एक मुलगा सेवानिवृत्त कृषी अधिकारी, दुसरा उच्च न्यायालयात क्लर्क, तर तिसरा मुलगा एका खासगी कंपनीत उच्च पदावर आहे. पण या मुलांनी सुखाच्या प्रसंगात आईला आपल्यापासून दूर केले. अखेर त्या आईला मायेचा आधार मिळाला, तो औरंगाबाद शहरात राहणारी मुलगी सुभद्रा व जावई श्रीकृष्ण टाकसाळे यांचा.