धरणगाव (प्रतिनिधी) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मोठा ट्वीस्ट आला आहे. कारण जिल्हा बँकेचे चेअरमन तथा राष्ट्रवादीचे नेते संजय पवार यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात लढणाऱ्या भाजप-शिवसेनेच्या शेतकरी पॅनलसोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष छापण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यासह विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा फोटो तसेच राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची नावे देखील आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक संदर्भात महाविकास आघाडीची बैठक नुकतीच धरणगावात झाली होती. यावेळी महाविकास आघाडीच्या शेतकरी पॅनलवर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. या बैठकीला माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी नगराध्यक्ष तथा उद्योजक सुरेशनाना चौधरी, शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, माजी लोकनियुक्त ज्ञानेश्वर महाजन, माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रप्रमुख रमेश पाटील, जानकीराम पाटील, डॉ. राजेंद्र देशमुख, रवींद्र चौधरी, ज्ञानेश्वर आमले, जयदीप पाटील, धनराज माळी, अरविंद मानकरी, अॅड. शरद माळी, डॉ. व्हि.डी. पाटील, अनंतसिंह परिहार, राजेंद्र पाटील, महानंदाताई पाटील हे उपस्थित होते. परंतू या बैठकीला आठवडा उलटत नाही तोच राष्ट्रवादीचे संजय पवार यांचा गट पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या शेतकरी पॅनलसोबत गेला आहे. या पॅनलचे एक प्रसिद्ध पत्रक सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
त्यात म्हटले आहे की. दि. २८ एप्रिल २०२३ रोजी धरणगांव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या होत असेलेल्या निवडणुकित शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी (संजय पवार गट) प्रणित सहकार पॅनलच्या वतीने पालकमंत्री गुलाबरावजी पाटील, आमदार चिमणराव पाटील, संजयदादा पवार, पी. सी. आबा पाटील, सुभाष आण्णा पाटील यांच्या नेतृत्वात सहकार पॅनलचे उमेदवार निवडणुक लढवित असल्याचे म्हटले आहे. या प्रसिद्धी पत्रकात शिवसेना-भाजपच्या पाधाधिकारींसह प्रसिद्धी प्रमुखमध्ये राष्ट्रवादीच्या सामाजीक न्याय विभागाच्या जिल्हाध्यक्ष कल्पना अहिरे तसेच राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष डॉ. सुभाष भिका देशमुख यांचे देखील नाव आहे. विशेष म्हणजे निवडणूक लढवीत असलेल्या पक्षांच्या नावात भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी (संजय पवार गट), असा उल्लेख आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादीत उभी फुट पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. दरम्यान, २० तारखेला माघारीनंतर निवडणुकीत खऱ्या अर्थाने रंगत येणार आहे.