धरणगाव (प्रतिनिधी) शहरातील मुख्य रस्त्यालगत अतिक्रमण वाढल्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत होता. यामुळे मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात यावे, अशी नागरिकांची मागणी होती. त्यानुसार धरणगाव नगरपरिषदेने नियोजन करून प्रथमत: फेरीवाल्यांसाठी जागा निश्चित केली आणि त्यांना त्या ठिकाणी स्थलांतरित केले. यामुळे मुख्य रस्त्यावरचा अतिक्रमणाचा प्रश्न सुटला आणि रस्त्यावर मोकळा श्वास घेतला.
नगरपरिषदेने गेल्या पंधरा दिवसांपासून फेरीवाल्यांसाठी स्थळ निश्चित करून त्यांना स्थलांतरित होण्यासाठी सूचना दिल्या होत्या. आज नगरपरिषदेने विशेष मोहीम राबवून सर्व फेरीवाल्यांना नियोजित ठिकाणी स्थलांतरित केले. आजच्या कारवाईमुळे मोकळा झालेल्या मुख्य रस्त्यावर पुन्हा अतिक्रमण होऊ नये यासाठी नगरपरिषदेने विशेष पथक नियुक्त केले आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी नगरपरिषदेस सहकार्य करावे, असे आवाहन नगरपरिषदेने केले आहे.
तसेच, नगरपरिषदेमार्फत प्लास्टिक बंदी बाबत जनजागृती देखील केली जात आहे. प्लास्टिक पिशवी व कॅरीबॅग यांचा वापर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आज नगरपरिषदेमार्फत प्लास्टिक बंदी मोहीम राबविण्यात आली. यामध्ये 24,000 रुपये दंड वसूल करण्यात आले आणि 50 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. ही मोहीम नगरपरिषदेने सातत्याने राबविण्याचे ठरवले आहे. नागरिकांनी प्लास्टिक पिशव्या व कॅरीबॅगचा वापर टाळावा, तसेच उघड्यावर कचरा टाकू नये. आपला दुकानाचा व घराचा कचरा घंटागाडीतच टाकावा, असे आवाहन मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांनी केले. आजची मोहीम मुख्याधिकारी रामनिवास झंवर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरीक्षक हेबतराव माधवराव पाटील, रवींद्र गांगुर्डे आणि आरोग्य विभागातील सर्व मुकादम व सफाई कर्मचारी यांनी यशस्वीपणे राबविली.