धरणगाव (प्रतिनिधी) जालना जिल्ह्यातील परतुर विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी काल एका जाहीर कार्यक्रमात शेतकरी मोदींनी व फडणवीस यांनी दिलेल्या पैशातून जोडे चपला घालतात, अंगावर कपडे घालतात, असे बेताल वक्तव्य करून शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. याविरुद्ध धरणगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी धरणगाव तालुक्यातील पथराड व झुरखेडा या गावात जोरदार निदर्शने करत लोणीकर व सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली.
यावेळी शेतकऱ्यांशी बोलताना धरणगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. व्ही डी पाटील म्हणाले की, बबनराव लोणीकर जे बोलले त्याचा शेतकऱ्यांनी निषेध नोंदवला नाही तर सत्ताधारी पक्ष वारंवार शेतकऱ्यांचा असाच अपमान करेल व याच्या परिणामी शेतकऱ्यांच्या मुलाबाळांच्या मानसिकतेवरही प्रतिकूल परिणाम होऊन आपण सरकारचे आश्रित आहोत अशा प्रकारचे लाचारीची मानसिकता तयार होईल.
पुढे बोलताना डॉ. पाटील म्हणाले की, बबनराव लोणीकर हे आजाराचे लक्षण आहे, खरा आजार मोदी पंतप्रधान बनल्यानंतर कोणत्याही शासकीय योजनांची अंमलबजावणी करताना ज्या पद्धतीने मोदी किंवा भाजप जनतेवर उपकार केल्यासारखे आम्ही तुम्हाला हा लाभ देत आहेत, असे बिंबवण्याचा प्रयत्न करतात त्याचाच हा परिणाम आहे. देशाच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याही पंतप्रधानांनी शासकीय नोकरी देताना नोकरी लागलेल्या तरुणांना ऑर्डर देण्यासाठी मेळावे भरवून पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्तीपत्रे दिली नव्हती, तो प्रकार मोदी सरकारने केला आहे. त्याचीच री ओढत महायुती सरकारने लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देताना राज्यभरात सरकारी खर्चाने मोठमोठे मेळावे भरविले होते. ही अत्यंत चुकीची प्रथा केंद्रातील मोदी सरकार व राज्याराज्यातील भाजप सरकारने पाडल्यामुळे याचेच अनुकरण करत भाजप कार्यकर्ते सरकार जनतेकरता काही योजना आखत असले तर जणू त्यांच्याच खिशातून ते जनतेला पैसा देत आहेत असा भ्रम बाळगतात, याचा कडाडून विरोध झाला पाहिजे असे ते म्हणाले.
या निदर्शनांना पथराड येथील अंबु लंके, रतन बोरसे, संजय शिंदे, विजय लौके, प्रेमराज सूर्यवंशी, साहेबराव पाटील, संतोष पाटील, सुरेश पाटील, जगन्नाथ पाटील, पुंडलिक पाटील, दिगंबर चौधरी, नवल पाटील, भगवान पाटील व पथराड तसेच झुरखेडा गावातील अनेक शेतकरी उपस्थित होते.