धुळे (प्रतिनिधी) मुंबईहून शहरात येणारे सुमारे ६४ लाखांचे सोने परिवहन महामंडळाच्या बस मधून चोरीला गेल्याची धक्कादायक घटना शनिवारी पहाटे घडली. कुरिअर कंपनीच्या डिलिव्हरी बॉयला बसमध्ये झोप लागल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी सोने लंपास केले.
सराफी पिढीच्या व्यापाऱ्यांनी मुंबईहून सोने केले होते खरेदी !
धुळे, जळगाव, नाशिक व नंदुरबार येथील काही सराफ मुंबईत खरेदी केलेले सोने जय बजरंग कुरिअरच्या माध्यमातून धुळे, नाशिक व नंदुरबारला आणण्याची जबाबदारी विष्णुसिंह शिखरवार (वय ३२ रा. नगलादास जि. आग्रा, हल्ली मुक्काम काळबादेवी मुंबई) या तरुणाच्या जय बजरंग कुरिअर कंपनीकडे देण्यात आली होती. कंपनीनी ही ही जबाबदारी गोविंद सिकरवर नामक कर्मचाऱ्याकडे दिली होती. गोविंदने नाशिक येथील सराफांचे ५० लाखांचे दागिने पोहचवले. त्यानंतर तो नाशिक बायपास गाडीने धुळ्यातील व्यापाऱ्यांच्या सोन्याच्या दागिन्यांच्या डिलिव्हरीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसमध्ये बसला.
झोप लागली अन् घात झाला !
या प्रवासादरम्यान चोरट्यांनी डाव साधत धुळे मालेगाव नंदुरबार येथील व्यापाऱ्यांचे सुमारे ६४ लाख ८० हजार रुपयांचे दागिने लंपास केले. कुरिअर कंपनीचा कर्मचारी गोविंद सिंह हा धुळे आगारात बस आल्यानंतर देखील झोपेतच होता. त्याला बसमधील प्रवाशांनी जागे केले. त्यानंतर गोविंदने कंपनीच्या वरिष्ठांना कळवत पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी सोने खरेदीच्या मूळ पावत्या मागितल्या, तसेच पडताळणीनंतर विष्णूसिंह निनुआ शिकरवार (वय ३२, रा. काळबादेवी, मुंबई) याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. पोलिसांनी बसस्थानक परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. तसेच तक्रारदाराकडून माहिती घेत पोलिसांनी कसून तपासाला सुरुवात केली आहे.