पुणे (वृत्तसंस्था) चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी गावात लोखंडी रिंग पडली. दरम्यान, उत्तर महाराष्ट्रापासून ते विदर्भापर्यंतच्या आकाशात दिसलेले अग्निलोळ हे चीनच्या ‘चँग झेंग ३ बी’ या रॉकेटच्या तिसऱ्या टप्प्याचे अवशेष असल्याचे स्पष्ट झाले आहे. आकाशात दिसलेल्या घटनेनंतर चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांत जमिनीवर सापडलेले अवशेष रॅकेटचा तिसरा टप्पा आणि चिनी रॉकेटच्या क्रायोजिनिक इंजिनाचे भाग असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
विविध कृत्रिम उपग्रह आणि रॉकेटचे अवशेष अवकाशातून पृथ्वीच्या वातावरणात कधी प्रवेश करतील याबाबत सोशल मीडियावर माहिती देणारे अभ्यासक जोसेफ रॅमिस यांनी शुक्रवारीच चिनी रॉकेटच्या वातावरणातील प्रवेशा बाबत अंदाज जाहीर केला होता. या अंदाजानुसार भारतीय प्रमाणवेळेनुसार शनिवारी रात्री सात वाजून ३२ मिनिटांनी चिनी रॉकेटचा वातावरण प्रवेश अपेक्षित होता.
प्रत्यक्षात या अंदाजापेक्षा दहा मिनिटे उशिरा म्हणजे सात वाजून ४२ मिनिटांनी चिनी रॉकेटच्या अवशेषांनी आफ्रिकेच्यावर वातावरणात प्रवेश केला. त्यानंतर वातावरणातून जमिनीच्या दिशेने येताना अवशेष भारतात सर्वप्रथम सुरत येथे पाहिले गेले. त्यानंतर वायव्येकडून आग्नेय दिशेने अवशेषांचा प्रवास सुरू असताना मध्य प्रदेश, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणांहून चिनी रॉकेटच्या जळत्या अवशेषांचे दर्शन घडले.
या घटनेनंतर चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांत नागरिकांना जमिनीवर धातूची वर्तुळाकार कडी आणि गोलाकार भाग सापडले. भारतीय अवकाश संशोधन संस्थेतील (इस्रो) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘महाराष्ट्राच्या आकाशात दिसलेली घटना आणि जमिनीवर सापडलेले अवशेष हे चार फेब्रुवारी २०२१ रोजी प्रक्षेपित करण्यात आलेल्या चिनी रॉकेट ‘चँग झेंग ३ बी’ या लाँग मार्च श्रेणीतील रॉकेटचे असल्याचे स्पष्ट आहे. भूस्थिर उपग्रहांना अवकाशात सोडण्यासाठी या रॉकेटचा वापर केला जातो.’
‘उपग्रह अवकाशात मुक्त केल्यानंतर तीन मीटर व्यास आणि १२ मीटर लांबी असलेला रॉकेटचा तिसरा टप्पा पृथ्वीभोवती काही काळ फिरत राहतो. कालांतराने त्या अवशेषांच्या कक्षेचा ऱ्हास होऊन ते वातावरणात प्रवेश करतात. चँग झेंग रॉकेटच्या तिसऱ्या टप्प्यात क्रायोजिनिक इंजिनचा समावेश असतो. ज्यामध्ये द्रवरूप हायड्रोजन इंधन म्हणून; तर द्रवरूप ऑक्सिजन ऑक्सिडायझर म्हणून वापरण्यात येतो. या दोन्ही घटकांच्या टाक्यांपासून ते इंजिन आणि तिसऱ्या टप्प्याचे कवच असे सर्व भाग शनिवारी वातावरणातून जमिनीकडे येताना घर्षणामुळे जळत आले. जमिनीवर सापडलेल्या कडीचा व्यास, इंजिनाचे भाग चिनी रॉकेटचे असल्याचेच सिद्ध करतात,’ असेही सूत्रांनी सांगितले.
अवकाशातून काल पडलेला तो तुकडा चायनीज रॉकेटचा
चंद्रपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये काल रात्री अवकाशात प्रवाही लाल गोळे दिसल्याने हा प्रकार काय, असा प्रश्न सर्वांना पडला होता. अनेकांनी त्यांच्या भागातील व्हीडीओ सोशल मीडिया शेयर केले आहेत. आता नासा मधील विज्ञान अभ्यासक लीना बोकील यांनी काल जे अवकाशातून पडलं ते चायनीज रॉकेट किंवा सॅटॅलाइट चा एखादा भाग असू शकतो असा दावा केला आहे.
भविष्यात अशा घटना वाढणार
पृथ्वीनजीकच्या कक्षेत फिरणारे रॉकेट आणि उपग्रहांचे सर्व निकामी आणि अनियंत्रित अवशेष वातावरणात प्रवेश करून घर्षणाने नष्ट होतात. त्यांचे काही भाग पूर्णपणे न जळता खाली आले तरी त्यांपैकी बहुतांश भाग समुद्रात कोसळतात. क्वचित प्रसंगी ते जमिनीवर आणि त्यातही मानवी वस्तीवर कोसळण्याची उदाहरणे सापडतात. मात्र, अवकाशातील कचऱ्याच्या वाढत्या प्रमाणासोबत मानवी वस्तीवर हे अवशेष कोसळण्याची शक्यताही वाढत जाणार असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. अशा अवशेषांमुळे कोणाचे नुकसान झाल्यास ज्या देशाच्या किंवा कंपनीच्या मालकीचे ते अवशेष आहेत, त्यांनी ज्यांचे नुकसान झाले त्यांना भरपाई देण्याची तरतूद आंतरराष्ट्रीय कायद्यामध्ये आहे.
केंद्र सरकारनं गंभीर दखल घेण्याची गरज
महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशमध्ये पडलेले आगीचे गोळे हे चीनच्या रॉकेटचे अवशेष असल्याचंही काही तज्ज्ञांनी म्हटलंय. फेब्रुवारी 2021 मध्ये चीननं ”चँग झेंग 3 बी” या नावाचं रॉकेट प्रक्षेपित केलं होतं आणि चीनच्या याच रॉकेटचे अवशेष महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये पडल्याचा अंदाज आहे. चीनच्या रॉकेटचे डेब्रीस भारतातील मध्यवर्ती राज्यांमध्ये पडलं. या घटनेत जीवितहानी झालेली नसली तर केंद्र सरकरानं या घटनेची गंभीर दखल घेण्याची गरज असल्याचं बोललं जातंय.
उल्कापात म्हणजे नक्की काय?
उल्का म्हणजे अवकाशातील खडक होय. हा खडक जेव्हा पृथ्वीच्या दिशेने अतिशय वेगाने प्रवास करत असतो त्यावेळी घर्षणाने खडक प्रकाशमान होतो. पृथ्वीच्या कक्षेत आल्यानंतर गुरुत्वाकर्षणाने हा खडक खेचला जातो आणि त्यानंतर अतिशय वेगाने या खडकाचा प्रवास भूपृष्ठाकडे सुरु होतो.काही उल्का या आकाशातच नष्ट होतात.अशाच एका उल्कापातामुळे महाराष्ट्रातल्या बुलडाणा जिल्ह्यात लोणार सरोवराची निर्मिती झालीय. सुमार 52 हजार वर्षांपूर्वी 2 दशलक्ष टन वजनाची उल्का जमिनीवर आदळली आणि त्यातूनच लोणार सरोवराची निर्मिती झालीय.