जळगाव (प्रतिनिधी) येथील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दर बुधवारी जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांची तपासणी केल्यानंतर त्यांना दिव्यांगत्व प्रमाणपत्र तातडीने देण्याची नियमावली आहे. मात्र तपासणी करता आलेल्या दिव्यांग बांधवांना तीन किंवा चार महिन्यांची पुढची तारीख दिली जात असल्याची धक्कादायक बाब महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने निदर्शनास आणलेली आहे. त्याबाबत महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.ठाकूर व जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील यांच्याशी संपर्क साधून दिव्यांग बांधवांना न्याय द्यावा याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड.जमील देशपांडे यांच्यासह मनसे पदाधिकारी यांनी बुधवारी चर्चा केली.
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६( शासन निर्णय क्रमांक अप्रवि २०१८/प्र. क.४६/ आरोग्य ६) नुसार दिव्यांगत्व तपासणी मूल्यमापन व प्रमाणपत्र वितरणासाठी शासनातर्फे मार्गदर्शक सूचना करण्यात आलेली आहे. मात्र या सूचनांना केराची टोपली दाखवण्याचे काम वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय यांच्याकडून होत असून जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांवर खूप मोठा अन्याय होत आहे. मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, महानगरपालिका रुग्णालय या ठिकाणी दिव्यांग बांधवांची तपासणी करावी व त्यांना मूल्यमापन व प्रमाणपत्र वितरीत करावे असे स्पष्ट आदेश आहेत.
जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये दिव्यांगत्व तपासणी होणे अपेक्षित आहे. मात्र चाळीसगाव, मुक्ताईनगर, चोपडा, जामनेर याठिकाणीच तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येते व त्याकरता सुद्धा जळगाव येथूनच डॉक्टर जात असतात. याबाबत अधिक विचारणा केली असता कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्यामुळे पंधरा तालुक्याच्या ठिकाणी तपासणी शिबिर करता येऊ शकत नाही अशी माहिती याप्रसंगी मिळाली.
दरम्यान शासकीय महाविद्यालय जळगाव येथे सर्व प्रकारच्या तपासण्या होत असल्यामुळे दिव्यांग बांधव जळगाव मध्येच येतात. ज्यांना नोकर भरती किंवा इतर शासकीय योजना करता दिव्यांगत्व प्रमाणपत्राची गरज असेल तर त्याकरता तीन किंवा चार महिने प्रतीक्षा करावी लागते ही अतिशय गंभीर बाब आहे. एकीकडे शासन दिव्यांग मंत्रालय बनवण्याच्या घोषणा करत असून दुसरीकडे दिव्यांग बांधवांना तारीख पे तारीख देऊन प्रताडीत केले जात आहे. बुधवारी येणाऱ्या दिव्यांग बांधवांना शासकीय महाविद्यालयाकडून अगोदरच तारीख टाकून ठेवलेले टोकन विचारीत केले जातात. सदर टोकन पद्धती तातडीने बंद करावी असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेला आहे.
जिल्ह्यातील ज्या बांधवांना दोन-तीन महिने पुढील तारखा मिळालेले आहेत त्या सर्वांना घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना अतिशय आक्रमक पद्धतीने आंदोलन करणार असल्याची माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲड.जमील देशपांडे यांनी दिली आहे. याप्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष किरण तळले, उपशहर अध्यक्ष ललित शर्मा, सतीश सैंदाणे, चेतन पवार, जनहित जिल्हा उपसंघटक राजेंद्र निकम, विभाग अध्यक्ष साजन पाटील, जनहित शहर अध्यक्ष प्रशांत बाविस्कर, किरण सपकाळ, खुशाल ठाकूर, उपस्थित होते.