मुंबई (वृत्तसंस्था) विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त १२ जागांच्या नियुक्तीबाबत महाविकास आघाडी सरकारच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. परंतु, हा प्रस्ताव तुर्तास पुढे ढकलण्यात आला आहे. महाआघाडीतील तिनी पक्षांचे या विषयावरील मतभेद मिटता मिटता उफाळून आल्याचे सांगण्यात येते. काही विशिष्ट नावांवरून हे सध्याचे मित्र पक्ष एकमेकांवर आक्षेप घेत असल्याची माहिती पुढे येत आहे.
राज्यपाल नियुक्त १२ नावांना मंत्रिमंडळाची मंजुरी देऊन ती नावं मंजूरीसाठी राज्यपालांकडे पाठवली जाणार आहेत. महाविकास आघाडी आणि राज्यपाल यांच्यात झालेल्या संघर्षानंतर राज्यपाल या नावांना पसंती देणार का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसे यांचे नाव असणार का ? याबाबत देखील राज्याच्या राजकारणात चर्चा सुरु आहे. मात्र अद्याप खडसेंचं नाव निश्चित झालं नसल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. अंतिम क्षणी खडसेंचं नाव येणार का ? हे पाहणं औत्सूक्याचं ठरणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस प्रत्येकी चार नाव देणार आहेत.
पुढील नावं चर्चेत ?
काँग्रेसकडून रजनी पाटील, सत्यजित तांबे, नसीम खान, मुझफर हुसेन, सचिन सावंत आणि मोहन जोशी या नावांची चर्चा आहे. तर राष्ट्रवादीकडून श्रीराम शेटे,गायक आनंद शिंदे आणि उत्तमराव जानकर यांच्या नावाची चर्चा आहे. यात राजू शेट्टी याचं नाव यापूर्वीच अंतिम झालंय.