नांदेड (वृत्तसंस्था) जिल्ह्यातील मुगट येथील गोदावरी नदीच्या काठावरील काटवनात २३ मे रोजी दुपारी तरुण आणि तरुणीचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती. युवकाच्या मोबाइलवरून त्याची ओळख पटली असून या दोघांचेही प्रेमसंबंध होते. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली की त्यांचा खून करण्यात आला?, हे आता पोलीस तपासातून समोर येणार आहे. विकास धोंडीबा तुपेकर (वय २२) ऋतुजा बालाजी गजले (वय १८) असे या प्रेमी युगलाचे नाव आहे.
या संदर्भात अधिक असे की, विकास आणि क्रतूजा गावात एकमेकांसमोरच घर आहे. त्यामुळे त्यांच्यात प्रेमसंबंध जुळाले होते. ही बाब दोघांच्याही कुटुंबियांसह गावातील लोकांना माहिती होते. दोघांच्या प्रेम प्रकरणाची संपूर्ण गावात जोरदार चर्चा होती. गेल्या ५ दिवसांपासून हे दोघेही जण गायब झाले होते. त्यामुळे सगळीकडे त्यांचा शोध सुरु होता. परंतू त्यातच २३ मे रोजी दोघांचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली. मृतदेह एवढे कुजलेले होते की, दोघांचा चेहरा देखील ओळखायला येत नव्हता.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दरम्यान, या घटनेतील मयत असलेल्या विकास तुपेकर या तरुणाला तरुणीच्या काही नातेवाईकांनी मुलीशी संबंध तोड म्हणून मारहाण केली होती. त्यानंतर काही दिवस हे प्रकरण शांत झाले होते. त्यानंतर प्रेमीयुगल अचानक गायब झाले होते.
गोदावरीच्या काठावर काटवनात ज्या ठिकाणी या दोघांचे मृतदेह आढळले, त्या भागात दिवसाही कुणी जाण्याची हिम्मत करत नाहीत. गावातील अनेकांना काटवनाचा रस्ताही माहिती नाही. त्यामुळे हे दोघे या ठिकाणी कसे पोहोचले? याबाबत पोलिसांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. प्रेमीयुगलाची हत्या झाली की, त्यांनी आत्महत्या केली?, याची माहिती शवविच्छेदन अहवालातून समोर येणार असली तरी गावात मात्र, उलटसुलट चर्चा आहेत.