छत्रपती संभाजीनगर (वृत्तसंस्था) शहरातील किराडपुऱ्यातील एका धार्मिकस्थळी तयारीसाठी जमलेल्या युवकांच्या एका गटाचा दुसऱ्या गटाशी वाद झाला. यानंतर काही क्षणातच परिसरात वादाने मोठा पेट घेतला. अनियंत्रित झालेल्या गटाने पोलिसांवरही हल्ला करत वाहने फोडली. या हल्ल्यात २ पोलिसांसह पाच ते सहा जण जखमी झाले. रात्री ११.३० वाजता सुरू झालेला हिंसाचार पहाटे ३.३० वाजेपर्यंत सुरू होता.
दोन्ही गटात सुरुवातीला बाचाबाची होऊन वाद वाढला व शिवीगाळ सुरू होऊन दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू झाली. त्यानंतर मात्र दोन्ही गटाकडून खासगी वाहनांना लक्ष्य करण्यास सुरूवात झाली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळतात, तत्काळ पोलिसांची कुमक घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी बळाचा वापर करून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न सुरू केला. पोलिसांनी वाढीव बंदोबस्त मागवला, मात्र ते येईपर्यंत जाळपोळ सुरू झाली होती. पोलिसांचे वाहन देखील दंगेखोरांनी जाळले. जमाव नियंत्रणात आणण्यासाठी काही धर्मगुरुंना बोलावण्यात आले. परंतू जमाव ऐकण्याच्या तयारीत नव्हता. काही वेळात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. मात्र दंगेखोरांनी त्यांच्यावरही दगडफेक करुन गाडीच्या काचा फोडल्या. पोलिसांनी लाठीचार्ज करुन जमावाला पांगवले. अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडला.
एका दैनिकाच्या वृत्तानुसार जमाव हाताबाहेर गेल्याने पोलिसांनी हवेत गोळीबार केला. हा गोळीबार दोन तीन वेळा ऐकू आल्याचे रहिवाशांनी सांगितले. आझाद चौक ते सिटी चौकापर्यंत सर्व पोलिस रस्ता पोलिसांनी बंद केला. त्याशिवाय बहुतांश नागरिकांच्या घरावर दगडफेक झाली. ३.३० वाजेपर्यंत जमाव नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू हाेते. तर सध्यस्थितीत सगळं नियंत्रणात असून येथे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. एसआरपी फोर्स ही तैणात करण्यात आली आहे. रात्री उशीरा या परिसरात रस्त्यांवर प्रचंड राडारोडा, कचरा, चपलांचा खच पडलेला होता. पोलिसांनी जाळलेली वाहने पहाटेच हटवली होती. दरम्यान, तसेच याविषयी मेसेज, फोटो किंवा व्हिडीओ फोनवर आले असता त्याची सत्यता पडताळल्याशिवाय विश्वास ठेवू नका असं आवाहन पोलिसांनी केलं आहे.