धरणगाव (प्रतिनिधी) कापूस व्यापारी स्वप्नील शिंपी खून प्रकरणातील पाचही आरोपींना आज धरणगाव न्यायालयात हजर करण्यात आले होते. पोलिसांनी थेट न्यायालयीन कोठडी मागितल्यामुळे पाचही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
या संदर्भात अधिक असे की, जळगाव येथून हवाल्याचे सुमारे १५ लाख रुपये घेऊन जाणाऱ्या एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथील कापूस व्यापारी स्वप्नील शिंपी यांचा पाळधी पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास पैसे लुटण्याच्या प्रयत्नातून खून झाला होता. या प्रकरणी एलसीबीच्या पथकाने पाच आरोपींना अटक केली होती. दरम्यान, पाच आरोपींपैकी एक आरोपी पोलीस कर्मचारी असल्याची माहिती आज पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे एका पत्रकार परिषदमध्ये दिली. दरम्यान, तपासावर परिणाम होऊ नये म्हणून आरोपींची नाव पोलीस अधीक्षकांनी गोपनीय ठेवण्याचे आवाहन पत्रकारांना केले.
दुसरीकडे आज सायंकाळी धरणगाव न्यायालयात न्या. सावरकर यांच्यासमोर आरोपींना हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी पाच आरोपींसाठी न्यायालयीन कोठडी मागितली. त्यानुसार कोर्टाने १३ डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे पाचही आरोपींची लागलीच जळगाव सबजेलला रवानगी करण्यात आली. दरम्यान, या गुन्ह्यात आरोपींची संख्या सहा असून यातील एक आरोपी अद्याप मिळून आलेला नाहीय. कोताही पुरावा किंवा क्ल्यू नसताना पोलिसांनी आरोपींना गजाआड करण्याची कामगिरी दाखवली आहे.
काय होती नेमकी घटना
जळगाव येथून हवाल्याचे सुमारे १५ लाख रुपये घेऊन जाणाऱ्या एरंडोल तालुक्यातील फरकांडे येथील कापूस व्यापारी स्वप्नील शिंपी यांची कार पाळधी पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास तीन दुचाकीवर आलेल्या चौघांनी अडवली. दुचाकीस्वाराला त्यांच्या कारने उडवल्याचा बहाणा करून पैशांची बॅग हिसकावून नेण्याचा प्रयत्न केला. व्यापाऱ्याने पैशांच्या बॅगेवरील स्वत:ची पकड सैल होऊ न दिल्यानंतर हल्लेखोरांनी त्यांच्या मांडीवर, पोटावर चाकूने वार केले. तशाही अवस्थेत व्यापाऱ्याने महामार्गावर जोरात पळत बचावाचा प्रयत्न केला. व्यापाऱ्यासह त्याच्यासोबतच्या कामगाराने प्रतिकार केल्यानंतर हल्लेखोर पैशांची बॅग सोडून पळून गेले. जखमी व्यापाऱ्याला तातडीने रुग्णवाहिकेत खासगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले होते.