मुंबई (वृत्तसंस्था) अंमलबजावणी संचलनालया (ED) ने मुंबई आणि परिसरात अंडरवर्ल्ड गॅंगस्टर दाऊद इब्राहिमच्या मालमत्तेच्या प्रकरणाशी संबंधित अनेक ठिकाणी छापेमारी सुरू केली आहे. या प्रकरणाशी संबंधितच ईडी आणि एनआयएचे ही छापेमारी असल्याचे कळते. सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील एक मंत्रीही या प्रकरणात सहभागी असल्याची ईडीला शंका आहे. हवाला प्रकरणी या मंत्र्यांची ईडीकडून चौकशीही करण्यात आली आहे.
१९८० च्या दशकामध्ये भारतसोडून पळ काढणाऱ्या दाऊद इब्राहिम परदेशात बसून देशामध्ये मोठे आर्थिक व्यवहार करतो असा तपास यंत्रणांचा अंदाज आहे. मुंबईमधील डी कंपनीचा संबंध पंजाबपर्यंत असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. या पंजाब कनेक्शनमुळे पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणा आयएसआयकडून अंडरवर्ल्डचा वापर पंजाबमध्ये दहशत पसरवण्यासाठी केला जात असल्याची शक्यता व्यक्त केली जातेय. या महिन्याच्या सुरुवातीलाच तपास यंत्रणांनी अबू बकारला अटक केलीय. १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी फरार असणारा अबू तब्बल २९ वर्षानंतर यंत्रणांच्या हाती लागला असून तो दाऊदचा जवळचा सहकारी आहे. अबूला संयुक्त अरब अमिरात म्हणजेच युएईमधून अटक करण्यात आलीय.
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीनं ऑपरेशन सुरु केलं
ईडीचा गैरवापर होत असल्याच्या आरोपांवरुन केंद्र आणि राज्यातला संघर्ष शिगेला पोहोचला आहे. अशातच मुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडीनं मोठी कारवाई सुरु केली आहे. काही नेत्यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या संपत्तीसंदर्भात केलेल्या कराराशी निगडीत हे छापासत्र असल्याची माहिती मिळत आहे. विशेष म्हणजे, केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीनं हे ऑपरेशन सुरु केलं असल्याचं माहिती. त्यात एनआयए देखील ईडीला या कारवाईसाठी मदत करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या सर्व प्रकरणात दाऊदचा भाऊ इक्बाल कासरकरचा ताबा घेऊन ईडी आणखी चौकशी करणार असल्याचंही कळतंय.
छापेमारीनंतर काही नेते अडचणीत येणार
मुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडीनं छापेमारी सुरु केली आहे. यावेळी ईडीच्या रडारवर डॉन दाऊद इब्राहीमची मुंबईतली मालमत्ता आणि त्या संपत्तीशी निगडीत करार करणारे काही नेतेमंडळी आहेत. दाऊदची बहीण हसीना पारकर आणि भाऊ इक्बाल कासकर यांच्या मुंबईतल्या घरी ईडीचं पथक पोहोचलं आहे. त्याठिकाणी अतिरिक्त फौजफाटा देखील मागवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीनं हे ऑपरेशन सुरु केल्याची माहिती मिळत आहे. एनआयए अर्थात, राष्ट्रीय तपास यंत्रणेला १५ दिवसांपूर्वी दाऊद संदर्भात काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले होते. त्या अनुषंगानं तपास करणाऱ्या ईडीच्या पथकानं आज मोर्चा दक्षिण मुंबईकडे वळवला. या छापेमारीनंतर काही नेते अडचणीत येऊ शकतात याची दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.
असा सुरु झाला मुंबईच्या गुन्हेगारी विश्वातील गँग वॉर
मुंबई पोलीस खात्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचा मुलगा असणारा दाऊद इब्राहिमने डोंगरीमधून आपल्या गुन्हेगारी क्षेत्रातील हलचालींना सुरुवात केली. डोंगरीमध्ये त्याची ओळख हाजी मस्तानच्या गँगशी झाली आणि तिथूनच मुंबईच्या गुन्हेगारी विश्वातील गँग वॉरचा कालावधी सुरु झाला. १९८० दरम्यान दाऊदला एका चोरी प्रकरणी अटक करण्यात आलेली. नंतर त्याच्यावरील गुन्ह्यांची संख्या वाढतच गेली. हाजी मस्तान आणि पठाण गँगदरम्यानच्या वादामुळे दिवसोंदिवस दाऊद अधिक धोकादायक झाला. पठाण गँगमध्ये प्रामुख्याने अफगाणिस्तानमधून आलेल्या लोकांचा समावेश होता. नंतर याच गँगवॉरमधून आणि वादामधून मुंबईवर आपली दहशत निर्माण व्हावी या हेतूने दाऊदने मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडवून आणले.