मुंबई (वृत्तसंस्था) मनी लाँडरिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाच्या रडारवर असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. ईडीनं त्यांना पाचव्यांदा समन्स बजावलं असून बुधवारी चौकशीसाठी हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
दरम्यान, ईडीने अनिल देशमुख यांच्यावर कारवाईचा भडीमार सुरु ठेवला आहे. त्यांची मालमत्ता देखील जप्त करण्यात आली आहे. याआधी अनिल देशमुख यांना चार वेळा ईडीकडून समन्स पाठवण्यात आला. पण ते चौकशीसाठी ईडी कार्यालयात उपस्थित राहिले नाहीत. आता पाचव्यांदा समन्स बजावल्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशमुख यांना १८ ऑगस्ट रोजी ईडीच्या दक्षिण मुंबईतील कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर ईडीसमोर हजर राहीन असं देशमुख यांनी मागील महिन्यात एक व्हिडिओ शेअर करून सांगितलं होतं. आता न्यायालयाचा निकाल आला असून ईडीनं समन्सही बजावलं आहे. त्यामुळं देशमुख उद्या हजर राहतात का याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.
याआधी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप केला होता. त्यामुळे सीबीआयने त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा देखील दाखल केला. त्यानंतर अनिल देशमुख आणि इतरांविरोधात देखील ईडीने गुन्हा दाखल केला. महत्त्वाचं म्हणजे ईडीने अनिल देखमुख आणि त्यांच्या कुटुंबाच्या ४.२० कोटी रुपयांच्या मालमत्ता जप्त केल्या.