पटणा (वृत्तसंस्था) भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आज शक्तीप्रदर्शन करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आपल्या समर्थकांसह प्रवेश करणार आहेत. खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने राज्यातील भाजपावर अगामी काळात मोठे परिणाम दिसून येणार असले तरी सध्या देशातील राजकारणातही खडसे यांच्या प्रवेशाचा मुद्दा गाजवण्यासाठी विरोधकांनी तयारी केल्याचे दिसत आहे. यामुळे बिहार निवडणुकीची रणधुमाळी सुरू असल्याने खडसे यांचा मुद्दा गाजणार आहे.
बिहारमधील महायुती खडसे यांच्या जाण्याने भाजपाची ओबीसी विरोधी प्रतिमा म्हणून निर्माण करण्याची तयारी करत आहे. आरजेडीचे राज्यसभेचे खासदार मनोज झा यांनी सांगितले की, गेल्या ६ वर्षांपासून भाजपाकडून एकनाथ खडसेंचा छळ केला जात होता, कारण ते ओबीसी समाजातील आहेत. खडसे यांनी भाजपाचे बिहार निवडणूक प्रभारी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेले आरोप गंभीर आहेत. महत्त्वाचे म्हणजे खडसे हे केवळ ओबीसी नेते म्हणून ओळखले जात नव्हते तर ते महाजन-मुंडे गटाचे खंदे समर्थकही होते. महाजन-मुंडे या जोडीने महाराष्ट्रात भाजपाला मोठी ताकद दिली होती असं ते म्हणाले.
एकनाथ खडसेंनी भाजपाला रामराम केल्यानंतर आता बिहारमध्ये विरोधी पक्ष हा मुद्दा जोरदार उचलून धरणार आहे. भाजपामध्ये मागासवर्गीयांचा सन्मान केला जात नाही तर जुन्या नेत्यांचा आदरही राखला जात नाही असा प्रचार भाजपाच्या विरोधात केला जाणार आहे. ज्यांनी भाजपाला कष्ट करून मोठे केले आता पक्ष त्यांना बाजूला ठेवत आहे. या माध्यमातून बिहारमधील जुन्या नेत्यांच्या समर्थकांनाही जवळ करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यात यशवंत सिन्हा, शत्रुघ्न सिन्हा, कीर्ती आझाद यांचा समावेश आहे ज्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली.
















