कोलंबो (वृत्तसंस्था) श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोताबया राजपक्षे यांनी देशाबाहेर पलायन केलं आहे. ते मालदीवमध्ये गेले असून तिथून दुबईला जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर रानील विक्रमसिंघे यांची श्रीलंकेचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली असून देशात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.
श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटबाया राजपक्षे देश सोडून मालदीवमध्ये पळून गेले आहेत. राजपक्षे यांनी देश सोडल्यानंतर श्रीलंकनवासीयांचा संताप उफाळून आला आहे. राजधानी कोलंबोच्या रस्त्यावर आंदोलक प्रचंड दंगली करत आहेत. जनतेचा तीव्र विरोध पाहून पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी आणीबाणी जाहीर केली आहे.हजारो लोक संसद भवन आणि पंतप्रधान भवनाकडे मार्च करत आहेत. अनेक ठिकाणी पोलिस आणि आंदोलकांमध्ये हिंसक चकमक झाली. दोन्ही गटांमध्ये हाणामारीही झाली असून त्यात 12 जण जखमी झाले. आंदोलकांनी राष्ट्रीय टीव्ही ‘रूपवाहिनी’चा स्टुडिओ ताब्यात घेतला, त्यानंतर वाहिनी बंद झाली आहे. श्रीलंकेत मोठ्या प्रमाणात वाढलेली महागाई, परकीय गंगाजळीचा आटत चाललेला साठा आणि रोजच्या आहारासाठी देखील रस्त्यावर उतरण्याची नागरिकांवर आलेली वेळ या पार्श्वभूमीवर श्रीलंकेमध्ये अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे.