नाशिक (वृत्तसंस्था) येथील पंचवटी याठिकाणी लग्नसोहळ्यासाठी आलेल्या एका महिलेसोबत विचित्र घटना घडली आहे. संबंधित महिला विवाह हॉलमध्ये पोहोचल्या असता त्यांचा जावई समोरून येत होता. यावेळी त्याने मावस सासूबाईंच्या पाया पडण्यासाठी त्यांची पर्स बाजूच्या एका खर्चीवर उचलून ठेवली. त्याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने दागिन्यांची पर्स गायब केली आहे. त्यांच्या पर्समध्ये जवळपास ४ लाख रुपये किमतीचे दागिने होते.
या प्रकरणी औरंगाबाद जिल्ह्यातील इटखेडा पैठण रोड येथील राहिवासी असणाऱ्या मनीषा उमेश सोनवणे यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून भामट्याचा शोध घेतला जात आहे. फिर्यादी सोनवणे या औरंगाबाद येथून लग्न सोहळ्यासाठी पंचवटी येथे आल्या होत्या. यावेळी त्यांनी लग्नात परिधान करण्यासाठी चार लाख रुपये किमतीचे दहा तोळं सोनं आणलं होतं. त्यांनी सर्व सोन एका पर्समध्ये ठेवलं होतं. पण चोरट्यानं भरदिवसा मंगल कार्यालयातून ही पर्स लांबवली आहे.
फिर्यादीच्या तक्रारीनुसार, चोरी झालेल्या पर्समध्ये तीन पदरी सोन्याचा हार, सोन्याचे गंठण, कानातील टॉप्स, सोन्याचा वेढा, विवो कंपनीचा मोबाईल फोन तसेच २० हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ४ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. प्रकार उघडकीस आल्यानंतर विवाहस्थळी एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.