पुणे (वृत्तसंस्था) : भाजपच्या देशाच्या कार्यकारणीत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांची वर्णी लागल्यानंतर पुण्यातील अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने चक्क उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी द्यावी, अशी मागणी करणारे भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पत्र लिहिले आहे. हे पत्र अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी लिहले आहे.
पत्रात नेमकं काय लिहिलं आहे –
अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, “संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीत देवेंद्र फडणवीस यांना आपण स्थान दिलंत त्याबद्दल अभिनंदन. देवेंद्र फडणवीस कुशल राजकारणी असून, मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनी हे सिद्ध केलं आहे. ते भाजपाचं भविष्य आहेत. नरेंद्र मोदी यांच्यानंतर भाजपाला सक्षम नेतृत्व देणाऱ्यांमध्ये जी काही दोन-तीन नावे आहेत, त्यात देवेंद्र फडणवीस यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. एक महिन्यापूर्वी त्यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास भाग पाडण्यात आल्याने धक्का नक्कीच बसला होता. पण आता घेतलेल्या निर्णयाने थोडासा दिलासा मिळाला आहे. या निवडीसोबत राष्ट्रीय कार्यामध्ये फडणवीसांच्या कामाला सुरुवात झाली आहे असं मानलं जाऊ शकतं”.
“पुण्यातील ब्राह्मण महासंघ २००९ मध्ये काँग्रेसच्या सुरेश कलमाडींसोबत उभा होता. २०१४ मध्ये अनिल शिरोळे आणि २०१९ मध्ये गिरीष बापट यांना पाठिंबा दिला होता. त्याचे परिणाम तुमच्यासमोर आहेत. त्यामुळे फडणवीसांसारख्या राष्ट्रीय नेतृत्वासाठी ही सुरक्षित जागा आहे. फडणवीसांना फक्त अर्ज भरायचा आहे, जिंकवण्याचं काम ब्राह्मण महासंघ करणार,” असा शब्दही त्यांनी दिला आहे.
“अटलबिहारी वाजपेयी, नरेंद्र मोदी यांच्यानंतर नेतृत्वाची ही परंपरा देवेंद्र फडणवीस कायम राखतील असा विश्वास आम्हाला वाटतो. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ कोणत्याही पक्षाचे समर्थन करत नाही. तरीही राष्ट्रहितासाठी आमचा आग्रह आहे,” असं त्यांनी पत्रात सांगितलं आहे.
गोविंद कुलकर्णी पुढे म्हणाले की, पुणे हा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचा गड असून 2006 मध्ये आम्ही काँग्रेसचे सुरेश कलमाडी, 2014 मध्ये भाजपचे अनिल शिराेळे, 2019 मध्ये गिरीष बापट यांच्यासाेबत उभे राहिलो. त्याचा परिणाम समोर आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी पुणे हा सुरक्षित मतदारसंघ आहे. फडणवीस यांनी या मतदारसंघातून नामांकन भरले, तर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ त्यांना विजयी करण्यासाठी काम करेल. अखिल भारतीय ब्राम्हण महासंघ कोणत्याही राजकीय पक्षाशी जोडलेला नाही. परंतु राष्ट्र हिताच्या दृष्टीने आमचा हा आग्रह आहे. कुलकर्णी पुढे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे हुशार राजकीय व्यक्तिमत्व असून त्यांनी यापूर्वी सलग पाच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री पद भूषवले आहे. राज्यातील जनतेचे कल्याण व्हावे याकरीता त्यांनी अथक प्रयत्न केले असून भाजपचे ते भविष्य आहेत.