मुंबई (वृत्तसंस्था) माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. दरम्यान या भेटीवरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. तसंच, फडणवीसांनी दिलेला फोन टॅपिंगचा अहवाल म्हणजे भिजलेला लवंगी फटाका निघाला त्याला वातही नव्हती, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. या भेटीत फडणवीस यांनी गृह सचिवांना फोन टॅपिंग संदर्भात ६.३ जीबीचा कॉल रेकॉर्डींग डाटा एका बंद पाकिटात दिला. आयपीएस आणि नॉन-आयपीएस अधिकाऱ्यांच्या महाराष्ट्रातील पोलिसांच्या बदल्यांसंदर्भातील रॅकेटची काही कागदपत्रेही दिली आहेत. त्यामुळं लेटरबॉम्बनंतर फडणवीसांच्या या पेनड्राइव्ह बॉम्बनं राज्य सरकार अडचणीत येणार असल्याची चर्चा असतानाच संजय राऊतांनी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. “दिल्लीत महाराष्ट्राच्या नेत्याने यायला पाहिजे. दिल्लीवर महाराष्ट्राचा प्रभाव असायला हवा आणि त्यादृष्टीने विरोधी पक्षनेते येत असतील तर त्यांचं स्वागत करायला हवं. काहीतरी कागद घेऊन आले आणि गृहसचिवांना भेटले अशा बातम्या पाहिल्या. तो कागद काही गंभीर नाही. विरोधी पक्षाच्या हातातील कागद गंभीर आहे की नाही हे सरकार ठरवणार. त्या अहवालात काडीचाही दम नाही. तो अहवाल जाहीर करावा, त्यात सरकारला अडचणीत आणेल असं काही नाही. त्याची काय दखल घ्यायची हे मुख्यमंत्री ठरवतील,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.
“तो जो काही बॉम्ब घेऊन विरोधी पक्षनेते आले होते तो भिजलेला लवंगी फटाका आहे. त्या फटाक्याला वातसुद्धा नव्हती. आम्ही दिल्लीत कुठे स्फोट झाला, महाराष्ट्रात काही पडसाद उमटतात का पाहत होतो. पण तसं काही दिसलं नाही. बंगालप्रमाणे महाराष्ट्र आणि दिल्लीत ‘खेला होबे’ सुरु आहे. यामुळे लोकांचं चांगलं मनोरंजन होत असून त्यासाठी कोणता मनोरंजन टॅक्सही भरायची गरज नाही,” असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
“काही चुकीचं झालं असेल तर त्यासाठी महाराष्ट्रातील गृहखातं सक्षम आहे, त्यासाठी केंद्रात येण्याची गरज नाही. महाराष्ट्रातील विरोधी पक्षनेते हे महाराष्ट्राच्या विधानसभेत निवडून आले आहेत. त्यांनी त्यांच्याकडील सगळा डाटा घेऊन मुख्यमंत्र्यांशी भेट घेऊन चर्चा केली तर महाराष्ट्राची भ्रत राहते. पण त्यात काही दम नसल्याने ते दिल्लीत आले. दिल्लीत अशा प्रकारचे भिजलेले फटाके वारंवार वात लावून फोडण्याची दिल्लीला सवय आहे. आम्ही याकडे गंमत म्हणून पाहत आहोत. पुढचा सिनेमा तो कोणता तयार करतायत याकडे आम्ही पाहतोय,” असंही संजय राऊत म्हणाले.