मुंबई (वृत्तसंस्था) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या आरोपावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. विशेष सरकारी वकिलांच्या कार्यालयात जाऊन १२५ तासांचे रेकॉर्डिंग करण्यात यश मिळवल्याबद्दल मी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतूक करतो, असं पवार म्हणाले.
विशेष सरकारी वकिलांच्या कार्यालयात जाऊन १२५ तासांचे रेकॉर्डिंग करण्यात यश मिळवल्याबद्दल मी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतूक करतो. पण १२५ तासांचं रेकॉर्डिंग करण्याची प्रकिया किती दिवस सुरु असेल, हे लक्षात घेतले पाहिजे. अशाप्रकारचे रेकॉर्डिंग शक्तिशाली यंत्रणाच करू शकतात. सध्याच्या घडीला केंद्र सरकारकडेच अशा यंत्रणा असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
पुढे ते म्हणाले की, १२५ तासांचं रेकॉर्डींग केलंय म्हणजे किती तयारी केली असेल ते बघा. मात्र, सार्वजनिक जीवनातील व्यक्तीबाबत तक्रार करताना त्याची शहानिशा करायला हवी. कुणीतरी तक्रार करायची आणि त्यानंतर लोकप्रतिनीधींवर यंत्रणांनी तपासणी करायची. विशेषत: महाराष्ट्र आणि बंगालमध्ये हे प्रकार अधिक आहेत. उदाहरण, अनिल देशमुख यांच्या प्रकरणामध्ये आधीच्या पोलिस अधिकाऱ्याने तक्रार केली. त्यानंतर देशमुखांना जेलमध्ये जावं लागलं. सत्तेचा गैरवापर करुन चौकशी कशी केली जाते, याचं चांगलं उदाहरण ते आहेत. त्यांच्या जवळच्या ९५ लोकांना आणि २०० लोकांशी चौकशी केली. जवळपास ९० छापे एका व्यक्तीच्या संबंधात टाकण्यात आल्याचं प्रशासनामध्ये असं कधी मी ऐकलं नव्हतं. एवढे छापे टाकूनही काही साध्य होत नसताना आणखी त्रास कशापद्धतीने देता येईल, याचे मार्ग शोधण्यात आलं.
तसेच प्रवीण चव्हाण यांच्या वक्तव्यांचा दाखला देत त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप शरद पवार यांनी फेटाळून लावले. या व्हीडिओत माझं नाव घेतले गेले आहे. पण माझं असं कोणतंही बोलणं झालेलं नाही. मी केवळ देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या एका सहाकाऱ्यासंदर्भात बोलण्यासाठी फोन केला होता. त्यावेळी मी तुमच्या सहकाऱ्यावर गंभीर आरोप असल्याचे देवेंद्र फडणवीस यांना सांगितले. यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून, ‘मी या प्रकरणात लक्ष घातले आहे, पुन्हा असा प्रकार घडणार नाही’, इतकेच मला कळवण्यात आले. याशिवाय, या प्रकरणाशी व्यक्तिश: माझा काहीही संबंध नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
तसेच शरद पवार यांना देवेंद्र फडणवीस यांना संपवायचे असल्याच्या आरोपालाही शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिले. राजकारणात कोणी कोणाला संपवत नसते. राजकीय प्रतिस्पर्ध्यांमध्ये स्पर्धा असते पण सत्तेचा गैरवापर केला जात नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. नवाब मलिक यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही. ते गेल्या २५ ते ३० वर्षांपासून विधिमंडळात आहेत. या काळात त्यांच्यावर कधी आरोप झाले नाहीत. मग आत्ताच त्यांच्यावर आरोप का होत आहेत? कोणत्याही मुस्लीम कार्यकर्त्याचं नाव दाऊदशी जोडायच, हा प्रकार घृणास्पद असल्याची टीकाही शरद पवार यांनी केली.