नवी दिल्ली (वृत्तसंस्था) नव्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करणारे शेतकरी आज राजधानीत घुसणार असून ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहेत. सुप्रीम कोर्टाने मध्यस्थी करण्यास नकार दिल्यानंतर दिल्ली पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली. कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून दिल्लीच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. यादरम्यान दिल्लीच्या दिशेने निघालेल्या हजारो शेतकऱ्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्टस तोडले आहेत. राजपथावरील संचलन पार पडल्यानंतर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यास शेतकऱ्यांना परवानगी आहे.
शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर रॅलीला सुरुवात झाल्यानंतर दिल्लीच्या दिशेने निघालेल्या हजारो शेतकऱ्यांनी पोलिसांनी लावलेले बॅरिकेड्टस तोडले. बॅरिकेट्स तोडून शेतकरी दिल्ली हद्दीवर दाखल झाले आहेत. राजपथावरील संचलन पार पडल्यानंतर ट्रॅक्टर मोर्चा काढण्यास शेतकऱ्यांना परवानगी देण्यात आली होती. परंतु, शेतकऱ्यांनी काही वेळ आधीच आपल्या ट्रॅक्टर परेडला सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं. दिल्ली-हरियाणाच्या टिकरी बॉर्डरवर शेतकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. पोलिसांनी सुरक्षेसाठी उभारलेले बॅरिकेट्स शेतकऱ्यांनी तोडले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे शेतकरी पंजाबमधील किसान मजदूर संघर्ष समितीचे असल्याची माहिती मिळत आहे. संयुक्त किसान मोर्चाने अद्याप मोर्चासाठी सुरुवात केलेली नाही. दरम्यान टिकरी बॉर्डरवर शेतकरी नेत्यांनी आंदोलकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे. पोलिसांसोबत बैठक घेऊन आंदोलनाची वेळ ठरवली जाईल अशी माहितीही त्यांनी दिली आहे. तीन वेगवेगळ्या ठिकाणांहून मार्गक्रमण करणाऱ्या मोर्चात २.५ लाख ट्रॅक्टरसह ५ लाख शेतकरी सहभागी होतील, असा दावा संयुक्त किसान मोर्चाने केला असला तरी, मोर्चात फक्त ५ हजार ट्रॅक्टर व तितच्याच संख्येने आंदोलकांच्या सहभागाची परवानगी दिल्ली पोलिसांनी दिली आहे. तीनही मोर्चे दुपारी १२ ते संध्याकाळी ५ या वेळेत काढले जाणार आहेत.