नवी दिल्ली (वृत्तसंस्था) गेल्या २२ दिवसांपासून केंद्राच्या कृषी कायद्यांचा विरोध करत शेतकरी आंदोलन करत आहेत. नोव्हेंबरमध्ये सुरू झालेल्या या आंदोलनादरम्यान आत्तापर्यंत जवळपास २० आंदोलक शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय. या दरम्यान, गुरुवारी पहाटे दिल्ली – हरयाणाच्या टिकरी सीमेवर आणखी एका आंदोलक शेतकऱ्यानं आपले प्राण सोडले. हा आंदोलक शेतकरी मूळचा पंजाबचा रहिवासी असल्याचं समजतंय. दिल्लीचा पारा ३ अंश सेल्शिअसपर्यंत खाली गेला आहे.
गेल्या काही दिवसांत दिल्ली आणि आजूबाजूच्या भागात तापमान वेगानं खाली गेलंय. पहाटेच्या सुमारास जवळपास ५ डिग्रीपर्यंत तापमानाची नोंद करण्यात आलीय. दिवसाही तापमान ४ डिग्रीपर्यंत नोंदवण्यात येतंय. या कडाक्याच्या थंडीमुळे रस्त्यावर आंदोलन करणाऱ्या आंदोलकाचा मृत्यू झाल्याचं समजतंय. तीन मुलांचा पिता असलेल्या ३७ वर्षीय पंजाबचा एक शेतकरी टिकरी सीमेवर मृत अवस्थेत आढळला. या शेतकऱ्याला १०, १२ आणि १४ वर्षांची तीन मुलं आहेत. शेतकऱ्याच्या मृत्यूची बातमी त्याच्या घरी कळवण्यात आलीय. शेतकऱ्यांनी केलेल्या दाव्यानुसार, नोव्हेंबरमध्ये सुरू झालेल्या या आंदोलनादरम्यान आत्तापर्यंत जवळपास २० आंदोलक शेतकऱ्यांचा मृत्यू झालाय. थंडीपासून वाचण्यासाठी आंदोलकांना अत्यंत कठीण परिस्थितीतून जावं लागतंय. काही स्वयंसेवकांच्या मदतीनं काही जणांना चादरी आणि हीटर उपलब्ध झाले असले तरी दिल्ली सीमेवर ठाण मांडून बसलेल्या शेकडो आंदोलकांना स्वत:ला ऊब मिळवणं कठीण जातंय. कोरोना संक्रमण काळात आणि कडाक्याच्या थंडीतही आपला जीव धोक्यात घालूनही आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आपण इथून हलणार नसल्याचं आंदोलकांकडून आधीच स्पष्ट करण्यात आलंय.
















