मुंबई (वृत्तसंस्था) ‘पंजाब व हरयाणातील शेतकरी रस्त्यावर येतो, त्याची फार गांभीर्यानं दखल घ्यायला पाहिजे होती. मला स्वतःला असं वाटतं की, हे असंच जर राहिलं, तर ते दिल्लीपुरत सीमित राहणार नाही,’ असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.
‘शेती आणि अन्न पुरवठा या बाबतीत पंजाब व हरयाणातील शेतकऱ्यांचं योगदान अधिक आहे. गहू आणि तांदूळ यांच्या उत्पादनात, तर सगळ्यात देशाची गरज या शेतकऱ्यांनी भागवली. जगातील १६ ते १८ देशांना धान्य पुरवठा भारत करतो. त्यात पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांचा वाटा फार मोठा आहे. याची केंद्र सरकारने दखल घ्यायला हवी होती. पण ती घेतलेली दिसत नाही,’ अशी खंत शरद पवार यांनी व्यक्त केली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील लोक या शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहतील आणि प्रश्नांची सोडवणूक आपल्या पद्धतीने करुन घेतील, अजूनही शहाणपणाची भूमिका घ्यावी,’ अशी अपेक्षा शरद पवारांनी व्यक्त केली आहे.
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात राजधानी दिल्लीत पंजाब, हरयाणासह देशातील इतर भागातील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. दिल्लीच्या सीमेवर हजारोंच्या संख्येनं शेतकरी दाखल झाले आहेत. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला महाराष्ट्रातूनही पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही केंद्र सरकारला फटकारले आहे.
















