मुंबई (वृत्तसंस्था) शेतकरी आंदोलनं सुरु झाल्या दिवसापासून त्यातील प्रत्येक वळण हे प्रकाशझोतात येत आहे. त्यातही कलाकारांनीही यामध्ये आपल्या भूमिका ठामपणे मांडण्यास सुरुवात केल्यामुळं आता कलाविश्वातही या आंदोलनाचे पडसाद उमटताना दिसत आहेत. शेतकरी आंदोलन राजकीय हेतून प्रेरित असल्याचं ट्वीट अभिनेत्री कंगना रनौतने केलं आहे. सोबतच तिने प्रियांका चोप्रा आणि दिलजीत दोसांज यांच्यावरही निशाणा साधला आहे.
याच शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री कंगना रनौत हिनं पुन्हा एकदा एक लक्षवेधी ट्विट केलं आहे. हे ट्विट करतकंगनानं एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये ती वारंवार आपल्या देशभक्तीवरच प्रश्न का उपस्थित केला जातो आणि मलाच देशभक्ती सिद्ध का करावी लागते, असा थेट सवाल करत आहे. प्रियांका चोप्रा आणि दिलजीत दोसांज यांच्या मनसुब्यांवर केव्हाच प्रश्न का उपस्थित केले जात नाही, असं म्हणत तिनं यामध्ये आणखी एका वादाला तोंड फोडलं. शाहीन बाग आंदोलनाची खरी बाब जशी समोर आली होती, त्याचप्रमाणंच शेतकरी आंदोलनामागचाही खरा हेतू समोर येईल तेव्हा मी सर्वांसमोर येऊन नक्की बोलेन असा शब्दच मी दिला होता, असं म्हणत कंगनानं आपली बाजू मांडण्यास सुरुवात केल्याचं या व्हिडिओमध्ये दिसत आहे. देशातील नागरिकांना उद्देशून तिनं प्रश्न केला, ‘मला दहशतवाद्यांशी अडचण नाही. देशाचं विभाजन करु इच्छितात त्यांचे हेतू मी जाणते. पण, सर्वसामान्य नागरिक कशा प्रकारे स्वत:ला इतरांच्या अधीन जाऊ देतात, अजाणतेपणानं तुम्ही परदेशी वर्चस्वाखाली येताच कसे?’ देशातील जनतेला उद्देशून प्रश्न करत कंगनानं पुन्हा स्वत:कडे सर्वांच्या नजरा वळवल्या. मी देशाबाबत वक्तव्य केल्या राजकारण करते असं अनेकांचं मत. पण, या दिलजीत दोसांज आणि प्रियांका चोप्रांनाही विचारा हे कोणतं राजकारण करत आहेत, असं म्हणत आपली नाराजी व्यक्त केली.
कंगना आणि दिलजीत दोसांज यांच्यामध्ये मागील काही दिवसांत शेतकरी आंदोलनाच्या मुद्द्यावरु अनेक खटके उडाले आहेत. याच पार्श्वभूमीवर दिलजीतला कलाविश्वातून काही कलाकारांनी पाठिंबा दिला आहे. तर, इथं कंगनाही तिच्या मतावर ठाम आहे. त्यामुळं कलाविश्वातही या कलाकारांमध्ये खडाजंगी पाहायला मिळत आहे.