नवी दिल्ली (वृत्तसंस्था) मंगळवारी प्रजासत्ताक दिनाला राजधानी दिल्लीत झालेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांकडून २२ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कृषी कायद्याच्या निषेधार्थ २६ जानेवारी रोजी शेतकरी ट्रॅक्टर रॅलीत झालेल्या हिंसाचारानंतर पोलिस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. दिल्ली पोलिसांनी जवळपास २०० जणांना ताब्यात घेतलंय. या आंदोलनकर्त्यांविरोधात दंगल घडवणं, पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ले करणं यांसारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आलीय.
हिंसाचार आणि तोडफोडीच्या घटनांवर आतापर्यंत २२ एफआयआर नोंदविण्यात आल्या असून, २०० पेक्षा जास्त समाज कंटकांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्यांच्याविरोधात जीवघेणा हल्ला आणि दरोडा प्रकरणातील कलमांतर्गत गुन्हा दाखल केले आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता क्राइम ब्रांचकडे सोपवण्यात आला आहे. पोलिसांनी जी एफआयआर दाखल केली आहे, त्यातील एका एफआयआरमध्ये ६ शेतकरी नेत्यांची नावे सामील आहेत. यात- राकेश टिकैत, दर्शन पाल, राजिंदर सिंह, बलबीर सिंह राजेवाल, बूटा सिंह बुर्जगिल आणि जोगिंदर सिंह आहेत. यांच्याविरोधात ट्रॅक्टर रॅलीतील नियम मोडल्याचा आरोप आहे. दरम्यान, उपद्रव्यांची ओळख पटण्यासाठी पोलिस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. याशिवाय, लाल किल्ला आणि सिंघू सीमेवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दुसरीकडे मेट्रो व्यवस्थापनाने आज पुन्हा लाल किल्ला आणि जामा मशीद मेट्रो स्टेशन बंद केले आहेत. पोलिसांनी दावा केला आहे की, काल झालेल्या हिंसाचारात ३०० पेक्षा जास्त जवान जखमी झाले आहेत. एका अॅडिशनल DCP वर तलवारने हल्ला करण्यात आला.
पोलिसांनी सिंघू आणि टीकरी बॉर्डरवर सुरक्षा वाढवली आहे. येथूनच शेतकरी आंदोलन सक्रीय झाले होते. तिकडे, लाल किल्यावरदेखील सुरक्षा वाढवली आहे. तिथे सध्या रॅपिड अॅक्शन फोर्स तैनात करण्यात आली आहे. याशिवाय, ड्रोनद्वारे परिसरात लक्ष्य ठेवले जात आहे. केंद्रीय पर्यटन मंत्री प्रह्लाद पटेल यांनी बुधवारी लाल किल्या जाऊन नुकसानीची पाहणी केली.
ट्रॅक्टर रॅली दरम्यान अनेक ठिकाणी पोलिसांकडून अश्रुधुराचा आणि लाठीचार्जचा वापर करण्यात आला होता. त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी बॅरिकेडस् तोडत राजधानी दिल्लीत प्रवेश केला होता. काही आंदोलकांनी दिल्लीच्या प्रसिद्ध लाल किल्ल्यावर धार्मिक ध्वज फडकावला होता. या दरम्यान अनेक पोलीस जखमी झाले होते. तसंच आयकर कार्यालय भागात काही सार्वजनिक आणि खासगी गाड्यांचीही तोडफोड करण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर सेलकडून तब्बल १००० हून अधिक ट्विटर हँडलची ओळख पटवण्यात आलीय. या लोकांनी सोशल मीडियावरून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या हिंसाचारात भूमिका निभावल्याचा पोलिसांना संशय आहे.