बीड (वृत्तसंस्था) पती-पत्नीमधील कौटुंबिक वादातून पत्नीचा चार्जरच्या वायरने गळा आवळून खून करत पतीने गळफास घेतल्याची घटना बीड तालुक्यातील नाळवंडी येथे गुरुवारी सकाळी समोर आली. या प्रकाराने तालुक्यात खळबळ उडाली होती. दोघांवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. बाबासाहेब रावसाहेब म्हेत्रे व कुशावर्ता बाबासाहेब म्हेत्रे अशी दोघांची नावे आहेत.
बाबासाहेब हे अल्पभूधारक असून ते व पत्नी इतरांच्या शेतात मजुरी करून उदरनिर्वाह चालवायचे. त्यांना दोन मुले व दोन मुली आहेत. दोन्ही मुलींचे लग्न झालेले आहे. लहान मुलीचे लग्न दोन-तीन महिन्यांपूर्वीच पार पडले होते. बाबासाहेब आणि कुशावर्ता यांच्यात सातत्याने या ना त्या कारणावरून वाद होत होते. किरकोळ कारणातून होणाऱ्या सततच्या वादाने बुधवारी रात्री टोक गाठले.
बुधवारी रात्री जेवण करून बाबासाहेब (४५) आणि कुशावर्ता (४०) एका खोलीत झोपले, तर दोन्ही मुले दुसऱ्या खोलीत झोपली होती. सकाळी मुले उठली तर आईवडील अजूनही झोपेतून उठत नसल्याचे पाहून त्यांनी त्यांच्या खोलीचे दार वाजवले. मात्र आतून काहीच प्रतिसाद आला नाही. त्यामुळे शेजारी राहणाऱ्या चुलत्यांना मुलांनी ही बाब सांगितली. त्यानंतर दार तोडण्यात आले. समोर कुशावर्ता यांचा मृतदेह जमिनीवर तर बाबासाहेब हे गळफास घेतलेल्या अवस्थेत होते.
दरम्यान, पोलिसांना माहिती दिल्यानंतर पिंपळनेर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक कैलास भारती यांनी सहकाऱ्यांसह भेट देऊन पाहणी केली. दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुशावर्ता यांच्या मृतदेहाजवळ मोबाइल चार्जरचे वायर सापडले आहे. गळ्यावर व्रण आहेत. त्यामुळे बाबासाहेब यांनी रागाच्या भरात आधी कुशावर्ता यांचा वायरने गळा आवळून खून केला, नंतर आपल्या हातून मोठी चूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी गळफास घेतला. दरम्यान, पती-पत्नीच्या या वादाला कुठलेही ठोस कारण नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकाराने खळबळ उडाली आहे.
एकाच चितेवर अंत्यसंस्कार !
गुरुवारी सकाळीच घटना समोर आल्यानंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात मृतदेहांची उत्तरीय तपासणी केली गेली. दुपारी मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिले गेले. सायंकाळी सहा वाजता एकाच चितेवर पत्नी-पत्नीवर अंत्यसंस्कार केले गेले.
दोन मुले झाली निराधार !
म्हेत्रे दाम्पत्याला दोन मुली असून, त्यांचे विवाह झालेले असल्याने त्या सासरी आहेत. आता एक १६ वर्षांचा, तर दुसरा १० वर्षांचा मुलगा आहे. कालपर्यंत आई- वडिलांच्या छायेखाली असणारी हे दोन्ही मुले आता मायेला पारखी झाली आहेत. या निराधार मुलांना कोण आधार देणार?, असा सवाल आहे. आपल्या आई वडिलांचे मृतदेह पाहून या मुलांनी आक्रोश केला. यावेळी हे चित्र पाहणाऱ्यांचे डोळेही पाणावले होते.
सगळे ठीक, मग का संपविले जीवन !
म्हेत्रे दाम्पत्याने बुधवारी रात्री आपल्या मुलांसोबत जेवण केले तेव्हा दोघेही खूश होते. तसेच त्यांच्यात काही दिवसांत टोकाचे भांडण झाल्याचीही माहिती कुणी दिली नाही. ■ मग रात्रीतूनच असे दोघांत काय वाद झाला की पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला आणि नंतर स्वतः आत्महत्या केली? याचे कारण आता पोलिस शोधत असून, परिसरातील ग्रामस्थांमधून वेगवेगळे तर्कवितर्क लढविले जात आहेत.