रायपूर (वृत्तसंस्था) छत्तीसगडच्या विजापूर आणि सुकमा या नक्षलवादी जिल्ह्यामध्ये शनिवारी नक्षलवाद्यांनी सुरक्षा रक्षकांवर हल्ला केला. या हल्ल्यात पाच जवान शहीद झालेत तर २१ जवान अद्याप बेपत्ता असल्याची नक्षलवादी विरोधी अभियानाचे पोलीस महानिरीक्षक ओपी पाल यांनी माहिती दिली आहे.
नक्षलवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात सुरक्षा रक्षकांचे १२ जवान जखमी झाले आहेत. या ठिकाणी एका नक्षलवादी महिलेचे प्रेत सापडले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. शुक्रवारी रात्री छत्तीसगड राज्यातील विजापूर आणि सुकमा जिल्ह्यामध्ये केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाचे कोबरा बटालियन, डीआरजी आणि एसटीएफच्या संयुक्त दलाने नक्षलवादी विरोधी अभियान सुरू केलं होतं. या नक्षलवादी विरोधी अभियानात जवळपास दोन हजार जवान सामील होते. शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास विजापूर-सुकमा जिल्ह्याच्या सीमेवर नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांवर अचानक हल्ला केला. ही चकमक सुमारे तीन तास सुरू होती. यामध्ये नक्षलवाद्यांचेही मोठे नुकसान झाले आहे अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी सोशल मीडियावरील संदेशात म्हटलं आहे की, “माझ्या संवेदना मावोवाद्यांच्या विरोधात लढताना शहीद झालेल्या जवानांच्या परिवारासोबत आहेत. त्यांचे बलिदान कधीही विसरण्यात येणार नाही.” असे म्हणत दुःख व्यक्त केले आहे.