अहमदनगर (वृत्तसंस्था) अण्णा हजारेंनी आंदोलन पुकारलं तर केंद्र सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राज्यातील भाजप नेत्यांकडून अण्णांची मनधरणी करण्याचं काम सुरु आहे. भाजपचे नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन हे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या भेटीला पोहचले आहेत. आज सकाळीच महाजन अण्णांच्या भेटीसाठी अण्णांच्या गावी म्हणजेच राळेगणसिद्धीत पोहोचले. याअगोदरही एकदा महाजन यांनी अण्णांची भेट घेतली होती.
आज सकाळी गिरीश महाजन यांनी अण्णा हजारे यांच्याशी चर्चा केली. गेल्या आठवड्यातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अण्णांची भेट घेतली होती. मात्र अण्णा आंदोलनावर ठाम असल्याने भाजप नेते अण्णांची मनधरणी करत आहेत. आपल्या मागण्यांसाठी केंद्र सरकारविरोधात अण्णा हजारे यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. गेल्या २ महिन्यांपासून अगोदरच दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे. 1) शेती मालाला दीडपट हमीभाव द्यावा, 2) स्वामीनाथन आयोगाला संविधानिक स्वायत्तता द्यावी आणि शेतकऱ्यांच्या शेती ह्या मागण्या अण्णा हजारेंनी केल्या आहेत. गिरीश महाजन आणि अण्णा हजारे यांच्यातली बैठक संपली आहे. अण्णांच्या मागण्यांबाबत दिल्ली येथे केंद्रीय कृषिमंत्री सोबत बैठक झाली असून काही निर्णय घेण्यात आले. कृषी माल भाव ठरवणारी उच्चाधिकार समिती स्थापन करणार, या निर्णयाचे पत्र गिरीश महाजन यांनी अण्णांना दिले. अण्णांनी आंदोलन करु नये अशी केली विनंती, महाजन यांनी अण्णांना केली. उद्या (शुक्रवार) केंद्रीय राज्यमंत्री अंतिम पत्र घेऊन अण्णांची भेट घेणार असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितलं.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी मंत्री आणि भाजपनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी २२ जानेवारीला अण्णा हजारेंची भेट घेतली होती. फडवणीस यांच्यापूर्वी विखे पाटील आणि अण्णा हजारे यांच्यात तासभर चर्चा झाली. त्यानंतर फडणवीस, विखे-पाटील आणि अण्णांमध्ये पुन्हा एकदा दीड तास बंद दाराआड चर्चा झाली. यावेळी गिरीश महाजनही उपस्थित होते. या बैठकीनंतरही आपण आंदोलनावर ठाम असल्याचं अण्णा हजारे यांनी स्पष्ट केलं होतं. केंद्रीय कृषीमंत्री यांनी दिलेलं पत्र देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला दिलं. त्यावर चर्चा झाली पण तोडगा निघाला नाही, असं अण्णा हजारे म्हणाले होते.