नवी दिल्ली (वृत्तसंस्था) माजी केंद्रीय मंत्री, राजस्थानचे खासदार बुटासिंग यांचे आज निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. केंद्रीय कृषीमंत्री, ग्रामविकास मंत्री, संसदीय कार्यमंत्री, क्रीडामंत्री, आशियाई गेम्सचे विशेष आयोजन समितीचे अध्यक्ष, बिहारचे राज्यपाल, राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोगाचे अध्यक्ष अशी विविध पदे त्यांनी भुषविली होती.
बुटासिंग यांचा जन्म २१ मार्च १९३४ रोजी झाला. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी पत्रकार म्हणून काम केले. अकाली दलाचे सदस्य म्हणून त्यांनी पहिली निवडणुक लढविली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. बुटासिंग हे प्रथम १९६२ मध्ये साधना मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेले होते. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचे निकटवर्ती म्हणून ते ओळखले जात. ते लोकसभेवर ८ वेळा निवडून गेले होते. अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून त्यांनी काम पाहिले. केंद्रीय गृहमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले. रेल्वे, वाणिज्य, जहाजबांधणी व परिवहन मंत्री, नागरी पुरवठा, ग्राहक व्यवहार आणि सार्वजनिक वितरण, लोकलेखा समिती अध्यक्ष, बिहारचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिले होते. बिहारचे राज्यपाल असताना राज्य सरकार बरखास्त करण्याचा निर्णय वादग्रस्त ठरला होता. सर्वोच्च न्यायालयाने त्यावर ताशेरे ओढले होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. बुटा सिंग गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते. दीर्घ आजारामुळे आज शनिवारी त्यांचं निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर आजच अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
बुटा सिंग यांच्या निधनावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक काँग्रेस नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. सरदार बुटा सिंग यांच्या निधनाने प्रामाणिक जनसेवक आणि निष्ठावान काँग्रेसी नेता गमावला आहे. देश आणि जनतेच्या सेवेसाठी त्यानी संपूर्ण जीवन आर्पित केलं होतं. त्यांचं हे योगदान कायम स्मरणात राहिल, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही सरदार बुटा सिंग यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. बुटा सिंग हे अनुभवी प्रशासक होते. दलित आणि गरीबांचा आवाज होते. त्यांच्या निधनाचं वृत्त ऐकून दु:ख वाटलं. बुटा सिंग यांच्या कुटुंबाच्या प्रती माझ्या संवेदना आहेत, असं मोदी यांनी त्यांच्या शोकसंदेशात म्हटलं आहे.