जळगाव (प्रतिनिधी) : राज्यातील शिंदे – फडणवीस सरकारचे लक्ष नसल्यामुळेच फॉक्सकॉन – वेदांता प्रकल्प राज्याबाहेर गेला, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी केला आहे.
खडसे म्हणाले की, महाराष्ट्रातील अनेक उद्योग गुजरातमध्ये स्थलांतरीत होतायत, ही दुर्दैवी बाब आहे. कोणतेही सरकार असले, तरी इथला उद्योग तिकडे स्थलांतरीत होऊ नयेत. गुजरातच नाही कर्नाटक असो वा आंध्र असो. कुठल्याही प्रदेशामध्ये इथला उद्योग जाता कामा नये, याची काळजी घेतली पाहिजे. दुर्दैवाने एखादा उद्योग स्थलांतरीत झाल्यानंतर समाजामध्ये प्रतिक्रिया खूप कमी उमटतात. त्यामुळे आपला दबाव शासनावर नसल्यामुळे आणि शासनाची भूमिका स्पष्ट नसल्याने असे उद्योग स्थलांतरीत होत आहेत, असल्याचेही खडसे म्हणाले.