जळगाव ( प्रतिनिधी ): राज्याच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या आदेशानुसार राज्यातील दिव्यांग कर्मचारी व दिव्यांग व्यक्तींच्या दिव्यांग प्रमाणपत्राची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. या तपासणीत जिल्हा परिषदेच्च्या ५ कर्मचाऱ्यांची निकषानुसार टक्केवारीत तफावत आढळून आल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी पाचही कर्मचाऱ्याविरुद्ध बुधवार दि.२१ जानेवारी रोजी निलंबनाची कारवाई केली आहे.
करणवाल यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. या पूर्वी देखील ८ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे आतापर्यंत निलंबित करण्यात आलेल्या कर्मचारी यांची संख्या १३ इतकी झाली आहे.
राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागामार्फत दिव्यांग कर्मचारी यांची युआयडी कार्ड तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. यात जळगाव जिल्हा परिषदेच्या विविध आस्थापनावर कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचारी यांची देखील तपासणी करण्यात येत आहे. या तपासणी दरम्यान दिव्यांग टक्केवारी तफावत आढळून आलेल्या कर्मचाऱ्याविरुध्द निलंबनाची कारवाई प्रस्तावित करण्यात येत आहे.त्यानुसार भास्कर रामदास चिमणकर, कनिष्ठ प्रशासन अधिकारी यावल, विनोद शांताराम बोधरे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी पंचायत समिती चोपडा, शांताराम उखरडू तायडे, वरिष्ठ सहाय्यक पंचायत समिती यावल, दिनेश लक्ष्मण नन्नवरे कनिष्ठ सहाय्यक ग्रामपंचायत विभाग, पारसमणी काशीराम मोर, कनिष्ठ सहाय्यक पंचायत समिती अमळनेर या पाच कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई बुधवार दि.२१ जानेवारी रोजी करण्यात आली आहे.
















