करमाळा (वृत्तसंस्था) ‘तुझ्या बहिणीशी लग्न लावून दे व तिचा मिळणारा पगार मला दे, असे म्हणत त्रास देत ३२ वर्षाच्या विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पती सासू, सासरे, नणंद व सावत्र मुलगा अशा एकूण आठ जणांविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी विवाहिता ही सध्या करमाळा तालुक्यात एका गावात राहत आहे. तर तिची बहीण एका बँकेत नोकरीला आहे. विवाहित फिर्यादीने म्हटले आहे की, माझा विवाह नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील तरुणाशी झाला. लग्नानंतर चार वर्षे मला व्यवस्थित नांदवले. त्यानंतर पैशाच्या कारणावरून सतत त्रास दिला.
कोरोना लॉकडाउनमध्ये हॉटेल बंद झाले. त्यामुळे पती सतत माहेरून पैसे घेऊन ये, असे म्हणून त्रास देऊ लागला. बहीण ही एका बँकेत नोकरी करते. तिच्याकडून पैसे घेऊन तो गेला; परंतु, तिलाही पैसे परत दिले नाहीत. त्याला सतत पैसे देणे जमेना म्हणून तो पत्नीस मारहाण करू लागला. त्यामुळे विवाहिता या माहेरी निघून आल्या होत्या. त्यानंतर नीट नांदवतो, अशी नोटरी भावाला लिहून दिल्यानंतर पुणे येथे राहायला गेले.
परंतू पुण्यात राहत असतानाही पैशाच्या कारणावरून छळ करू लागले. परत माहेरी आल्यानंतर पतीने गोड बोलून पुणे येथे बोलावून घेतले. तर दीर, जाऊ, सावत्र मुलगा, सासू, सासरे व नणंद हे पैशाच्या कारणावरून जाच करत होते. पती हा माझ्या बहिणीशी लग्न लावून दे व तिचा मिळणारा पगार मला दे, असे म्हणून सतत छळ करीत होता. त्याच्या या त्रासाला कंटाळून बहिणीच्या घरी आले, असे फिर्यादीत म्हटले आहे.