अहमदनगर (वृत्तसंस्था) माजी मंत्री आमदार गिरीश महाजन यांनी आज राळेगणसिद्धी येथे सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांची भेट घेतली. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळेस अण्णांशी गप्पा मारीत असताना शेतकऱ्यांची परिस्थिती शेतकऱ्यांच्या समस्या, सध्या भेडसावणारी विजेची समस्या व राज्यभरात पडणारा सतत कुठे ना कुठे पाऊस या विषयावरही चर्चा झाली.
गिरीश महाजन म्हणाले, राज्यातील सरकारने राज्याला गेल्या दोन वर्षात किती तरी मागे नेऊन ठेवलं आहे. राज्यात कोणत्याही प्रकारची कामे सुरू नाहीत. राज्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. या सरकारने भ्रष्टाचाराचे विक्रम मोडले आहेत, असा गंभीर आरोप गिरीष महाजन यांनी राज्य सरकारवर केला. ते पुढे म्हणाले की, राज्यातील मंत्र्यांवर सध्या मोठ्या चौकश्या सुरू आहेत. भ्रष्टाचाराला तर कोणतीच मर्यादा शिल्लक राहिली नाही. राज्यात अगदी सनदी अधिकाऱ्यांपासून तर थेट खालच्या शिपायांपर्यंतचा सर्वच जण सांगत आहे की राज्यात असा कधी भ्रष्टाचार पाहिला नव्हता किंवा होईल असा कधी विचार केला नव्हता. राज्यात कुठेही कायदा आणि सुव्यवस्था शिल्लक राहिलेली नाही. मंत्र्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई अथवा चौकशी नाही. हा तर सरकारचा निर्लज्जपणाचा कळस आहे.
एसटी कर्मचाऱ्यांचा संप गेल्या महिन्याभरापासून सरकारला मिटवता येत नाही. हे सरकारचे अपयश आहे. आम्ही सत्तेत असताना मराठा समाज आंदोलन, ओबीसी आरक्षण मुद्दा, नाशिक येथून निघालेला लाल बावट्याचा मोर्चा, प्रतिभा शिंदे यांचे आंदोलन असे विविध मोर्चे, आंदोलन राज्य सरकार विरोधात झाले मात्र सरकार म्हणून आम्ही त्यांना भेटत होतो. त्यांच्याशी चर्चा करत होतो, त्यांना आंदोलन स्थळी जाऊन भेटत होतो. मी स्वतः या घटनांचा साक्षीदार आहे. मुख्यमंत्र्यांकडे घेऊन जायचो. त्यावेळी सर्वपक्षीय चर्चा व्हायची. मात्र या सरकारला आंदोलनाचे काही घेणं देणं नाही. आंदोलन, उपोषण, मोर्चा काढा मात्र यांना त्याचे काही सोयरसुतक नाही. राज्यातील वरिष्ठ मंत्र्यांनी अथवा त्या संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी आंदोलन सुरू झाल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांना भेटणं गरजेचे होतं मात्र तसे झाले नसल्याने सध्या राज्यातील जनतेचे हाल होत आहेत आणि आंदोलनही चिघळल आहे, असेही महाजन यांनी सांगितले.