अहमदनगर (वृत्तसंस्था) “आमच्या समोर भाजप, शिवसेना किंवा काँग्रेस असे कोणीही नाही. आमच्यापुढे फक्त समाज आणि देश आहे. ज्यावेळी समाज आणि देशासाठी घातक असणारे कृत्य होत असते. त्यावेळी आम्ही आंदोलन करतो. तुमच्या मंत्र्यांनी कसा भ्रष्टाचार केला आणि तुम्ही त्यांना कसं पाठीशी घातलं याचे सगळे डिटेल्स माझ्याकडे आहेत. ते सगळे डिटेल्स मी देईल,” असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शिवसेनेला दिला.
शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांविरोधात माझ्याकडे भक्कम पुरावे आहेत. ते बाहेर काढावे लागतील, असा सज्जड इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी शिवसेनेला दिला. उपोषण स्थगित करण्याच्या मुद्द्यावर शिवसेनेच्या मुखपत्रातून टीका करण्यात आली असून अण्णा केवळ काँग्रेसच्या राजवटीत आंदोलने करतात. तसेच हजारे यांच्या भूमिकेविषयी अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. त्यामुळे संतापलेल्या अण्णांनी शिवसेनेच्या मंत्र्यांचे आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांचे ‘डिटेल्स’ आपल्याकडे आहेत, ते जाहीर करण्याचा इशारा दिला आहे. हजारे यांनी १९९७ मध्ये आळंदीत झालेल्या आंदोलनाची आठवण करून दिली. या आंदोलनामुळे शिवसेनेच्या बबनराव घोलप, शशिकांत सुतार या भ्रष्ट मंत्र्यांना मंत्रिमंडळातून पायउतार व्हावे लागले. आपल्या मागणीनुसार स्थापन करण्यात आलेल्या न्यायमूर्ती सावंत आयोगाच्या चौकशीत तत्कालीन मंत्री घोलप आणि सुतार गैरव्यवहार प्रकरणात दोषी असल्याचे सिद्ध झाले होते. या गोष्टी तुम्ही विसरला काय, असा सवाल हजारे यांनी शिवसेनेला केला.
यावेळी बोलताना अण्णा हजारे यांनी शिवसेनेवर चौफेर टीका केली. शिवसेनेचा मंत्र्यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत तो बाहेर काढण्याचाही निर्वाणीचा इशारा त्यांनी शिवसेनेला दिला. “तुमच्या मंत्र्यांनी कसा भ्रष्टाचार केला आणि तुम्ही त्यांना कसं पाठीशी घातलं याचे सगळे डिटेल्स माझ्याकडे आहेत. ते सगळे डिटेल्स मी देईल,” असं अण्णा म्हणाले. तसेच, भाजप सत्तेवर आल्यानंतर माझे एकूण ६ आंदोलनं झाली, हे आंदोलन आपण विसरलात का?,” असा प्रतिप्रश्नही त्यांनी शिवसेनेला केला.
हजारे यांनी उपोषण स्थगित केल्यानंतर विश्वासार्हतेविषयी प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्या वेळी अस्वस्थ झालेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तरांची गरज नसल्याचे सांगत पत्रकार परिषद गुंडाळण्याचा प्रयत्न केला. शनिवारी पुन्हा त्याबाबत हजारे यांना छेडले असता ज्यांनी ज्या रंगाचा चष्मा घातला आहे, त्यांना त्याच रंगाचे दिसणार, असे ते म्हणाले. जलसंपदा व शालेय शिक्षण मंत्री बच्चू कडू यांनी शनिवारी राळेगणसिद्धीत हजारे यांची भेट घेतली. राज्याच्या विविध विभागातील भौगोलिक, नैसर्गिक परिस्थिती वेगवेगळी आहे. त्यामुळे शेतीमालाला विभागनिहाय हमीभाव मिळाला पाहिजे, अशी अपेक्षा मंत्री कडू यांनी व्यक्त केली.