मुंबई (वृत्तसंस्था) वाढीव वीज बिलांमुळे वैतागलेल्या राज्यातील वीज ग्राहकांना मोठ्या प्रमाणात लवकरच दिलासा मिळणार आहे. ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी काल हे संकेत दिले. राज्यातील नागरिकांना ही दिवाळी भेट लवकरच मिळेल असेही त्यांनी म्हटले आहे. मुंबईत 12 ऑक्टोबरसारखी स्थिती निर्माण होऊ नये, म्हणून त्यांनी टाटा पॉवरला वीज उत्पादन वाढवण्याचीही सूचना केली आहे. ते म्हणाले की, खासगी वीज उत्पादकांची दोन युनिट सध्या बंद आहेत. राऊत यांनी काल टाटा पॉवरला भेट दिली. त्यावेळी तेथे ते पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले की, राज्यातील अनेकांनी आपल्याला वाढीव बिल आल्याची तक्रार केली आहे. त्यातून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. या संबंधात राज्याच्या वित्त विभागाला सात वेळा प्रस्ताव पाठवण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. आता त्याला काही प्रमाणात यश येऊ लागले आहे असे दिसते आहे, असेही त्यांनी सांगितले. काल सोमवारीच या संबंधात मातोश्रीवरून त्यांना चर्चा करण्यासाठी निमंत्रण आले होते.
वित्त विभागाकडे आता ही सवलतीच्या प्रस्तावाची फाईल पाठवण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना लवकरच दिवाळीची भेट मिळेल, असा विश्वासही मंत्र्यांनी व्यक्त केला. राज्याच्या वीज विभागाच्या तीन विभागांमध्ये सध्या समन्वयाचा अभाव दिसत असून तिनही विभागांना परस्परांतील समन्वय वाढवण्याची सूचना करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.