मुंबई (वृत्तसंस्था) अखेर मान्सून केरळमध्ये (Kerala) दाखल झाला आहे. याबाबतची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत मान्सून केरळच्या उर्वरित भागासह कर्नाटक आणि महाराष्ट्रात (Maharashtra) दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात येत आहे.
बंगालच्या उपसागरात ‘आसानी’ या चक्रीवादळाच्या प्रभावामुळे या वेळी मान्सून वेळेआधीच केरळमध्ये होणार, असा अंदाज हवामान खात्याने यापूर्वी वर्तवला होता. मान्सूनच्या आगमनाने केरळमध्ये २९ मे ते १ जून या कालावधीत अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्याचवेळी 30 मे रोजी लक्षद्वीपमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. केरळमधील हवामान पुढील काही दिवस असेच राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.
हवामान खात्यानुसार, आज बिहार आणि झारखंडच्या अनेक भागात पाऊस पडू शकतो. बिहार आणि झारखंडमध्ये पुढील काही दिवस पाऊस आणि वादळी पावसाची शक्यता आहे. आता मान्सून पुढच्या सात दिवसात तळकोकणात दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यंदाही 4 ते 5 जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर मान्सून हळूहळू मुंबई, पुणे अन्य ठिकाणी दाखल होणार आहे. जूनमधील मान्सूनचा प्रवास पहिल्या दोन आठवड्यात मंदावलेला असेल, त्यानंतर तो सर्वत्र मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.