मुंबई (वृत्तसंस्था) अभिनेत्री कंगना रणौत आणि शिवसेनेचा वाद सुरूच आहे. शिवसेनेला डिवचणाऱ्या कंगनाला शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांनी टोला लगावला आहे. बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का हो भाऊ, असा मिश्किल सवाल करत उर्मिला यांनी कंगनाचं नाव न घेता तिच्यावर निशाणा साधला आहे.
मंगळवारी मुंबईत आल्यानंतर कंगनाने मुंबादेवी आणि प्रभादेवीच्या सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ती म्हणाली, मुंबईत राहण्यासाठी अन्य कोणाची नव्हे तर, गणपतीबाप्पाची परवानगी आणि आशीर्वादाची गरज आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीने नोटीस बजावली आहे. बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने हे निमित्त साधून शिवसेनेवर टीका केली. काँग्रेसमधून नुकताच शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या उर्मिला मातोंडकरने यावर कंगनाला ट्विटरवरून टोला लगावला आहे. माझ्या प्रिय मुंबई शहराच्या पाठी उभं राहण्यासाठी असं म्हणत उर्मिला यांनी बाईंच्या डोक्यावर अपघात झाला आहे का भाऊ, असा सवाल केला. उर्मिला यांनी याआधीही कंगनावर हल्लाबोल केला होता. त्यामुळे त्यांच्या या ट्विटनंतर पुन्हा एकदा सोशल मीडियावर शाब्दिक चकमक रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.
कंगना आणि उर्मिलामध्ये यापूर्वीही वाद निर्माण झाला होता. एका मुलाखतीत कंगनाने उर्मिलाचा सॉफ्ट पॉर्नस्टार असा उल्लेख करत, ती अभिनयासाठी ओळखली जात नाही, अशी टिप्पणी केली होती. तर, तिला उत्तर देताना उर्मिला म्हणाली की, तिला माहिती आहे का, कंगनाचे हिमाचल प्रदेश हेच ड्रग्जचे केंद्र बनले आहे. त्यामुळे तिने तेथूनच सुरुवात करायला हवी.