येवला (वृत्तसंस्था) कौटुंबिक कलहातून पतीने पत्नीवर पिस्तुलाने गोळी झाडली. त्यामध्ये पत्नीचा मृत्यू झाल्याचे समजून त्याने स्वत:वर गोळी झाडत आपलं आयुष्य संपवलं. जखमी पत्नीवर नाशिकच्या खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली.
बाजीरावनगर भागातील गणपती मंदिराजवळ राहत असलेला किरण आनंदा दुकळे (३८) हा पाटबंधारे विभागात कालवा निरीक्षक पदावर तालुक्यातील महालखेडा येथील नांदूर मधमेश्वर जुना कालव्यावर कार्यरत आहे. गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास किरण याचे पत्नी वैशाली (३२) हिच्याशी भांडण झाल्याची चर्चा असून त्यानंतर किरणने संतापाच्या भरात पत्नी वैशालीवर गावठी कट्ट्यातून गोळी झाडली. ही गोळी तिच्या डोक्याच्या पाठीमागील बाजूस लागल्यानंतर ती जागेवरच कोसळली. यानंतर किरणने स्वयंपाकघरात जाऊन स्वतःच्या कानावर गोळी मारत आत्महत्या केली. किरणचे वडील घराच्या वरच्या मजल्यावर झोपलेले असताना किरणचा मोठा मुलगा समर्थ याने (११) आजोबांना घटनेची माहिती सांगितल्यातर त्यांनी आजूबाजूच्या नागरिकांना उठवले. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक भगवान मथुरे, उपनिरीक्षक मनोहर मोरे, सूरज मेढे, हवालदार राकेश होलगडे, राजेंद्र पाटील, विजय पैठणकर आदी तत्काळ घटनास्थळी पोहोचले. किरणने गावठी कट्ट्यातून दोन राउंड फायर केले असून एक जिवंत काडतूस घटनास्थळी सापडले आहे. मनमाड विभागाचे पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांनी भेट देत पाहणी केली. नाशिक येथील पोलिस दलातील न्यायवैद्यक विभागाने घटनास्थळाची पाहणी व तपासणी केली आहे. या दांपत्यास समर्थ व स्वामिनी (६) अशी दोन मुले असून ९ एप्रिल रोजीच मुलगी स्वामिनी हिचा वाढदिवस साजरा झाला होता. यानंतर दोघा पती-पत्नीमध्ये वाद विकोपाला गेल्यानंतर स्वामिनीला वैशालीच्या आईवडिलांनी त्यांच्या घरी नेल्याची चर्चा आहे.
दरम्यान, या प्रकरणातील गूढ वाढले असून किरणच्या मृतदेहाचे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर सायंकाळी मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. फॉरेन्सिक न्यायवैद्यक तज्ज्ञांकडून शवविच्छेदन करण्यात येणार असून या अहवालानंतर घटनेचे सत्य बाहेर येण्याची शक्यता आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मनोहर मोरे करत आहेत.